शेलपिंपळगाव : चाकण–शिक्रापूर रस्त्यावरील साबळेवाडी हद्दीतील घाट रस्ता अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः चाकणहून शिक्रापूरकडे जाताना असलेला तीव्र चढ वाहतुकदारांसाठी डोकेदुखी बनू लागला आहे. मंगळवारी (दि. १) सकाळी शिक्रापूरकडे जाणाऱ्या एका अवजड ट्रकमधून भर प्रवासादरम्यान लोखंडी सळया रस्त्यावर निसटल्या, त्यामुळे ट्रकची पुढची बाजू हवेत उचलली. सुदैवाने ट्रकच्या पाठीमागे कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.अधिकच्या माहितीनुसार, चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. औद्योगिक वसाहतींसाठी कच्चा माल परराज्यातून आणणारी अनेक मोठी वाहने सातत्याने येथूनच प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील साबळेवाडी व शेलपिंपळगाव येथील धोकादायक वळणे वाहतुकदारांसाठी जीवघेणी ठरत आहेत.विशेषतः साबळेवाडी हद्दीतील तीव्र घाट रस्ता पार करताना अवजड वाहनांना मोठी मेहनत करावी लागते. अनेक वाहनांना रस्ता पार होत नाही, त्यामुळे रस्त्याच्या मधोमध ही वाहने तासनतास उभी राहतात. परिणामी, इतर वाहतुकीला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. घाट रस्त्यात वाहन उभे असल्याने समोरून येणाऱ्या भरधाव वाहनांना अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.अनेकदा वाहनांच्या चाकांना लावलेले दगड रस्त्यावरच पडलेले असतात, त्यामुळे दुचाकी तसेच आलिशान वाहनांना हे दगड घासले जाऊन अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या चौपदरीकरण कामादरम्यान साबळेवाडीचा वळण रस्ता सरळ करून चढ कमी करण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच वाहतूकदारांकडून केली जात आहे.
टेम्पोची चाके गेली हवेत; साबळेवाडी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी ठरतोय यमदूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:37 IST