आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारपासून (दि.६) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डूडूळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक अशा दहा गावांत सोहळा समाप्तीपर्यंत अर्थातच १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. एकादशी ११ डिसेंबरला तर संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. यापार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह ८ डिसेंबरला आळंदीत दाखल होतील.
आळंदी शहरात तसेच माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिराकडे येणाऱ्यामार्गावर, प्रदक्षिणा रस्ता, शहर प्रवेश करणारे रस्तेही बंद केले जाणार आहेत. पुण्याहून आळंदीकडे येणाऱ्या मॅक्झीन फाटा, डुडुळगाव, चिंबळी फाटा, चाकण रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता प्रवासास पूर्ण बंद राहणार आहे.