पुणे : ‘अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याबाबत पोलिस आयुक्त काय बोललेत हे मी बघितलेलं नाही. मात्र असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याने स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घेतलं पाहिजे. या प्रकारे क्लीन चिट कशी दिली जाऊ शकते? कमाल आहे!’ अशा शब्दांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.शिवजयंती कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले विचार आजही आपण आचरणात आणतो. आज जी लोकशाही आपण आचरणात आणत आहोत, त्या लोकशाहीचा ढाचा जर कोणी रचला असेल, तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ३९५ वर्षे उलटल्यानंतरही त्यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे; कारण इतर जी राजघराणी होती, त्यांनी स्वतःचं स्वराज्य वाढवण्यासाठी लढा दिला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी वापरला गेल्यास ते अधिक योग्य ठरणार आहे. यामुळे गडकिल्ल्यांचे पर्यटनही वाढेल आणि त्यातून स्थानिकांना रोजगारही मिळेल, असेही उदयनराजे यांनी सांगितले.