बारामती : राज्यातील महापालिका निवडणुकांत एकत्र लढूनही दारुण पराभवाला सामोरे गेलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसऱ्याच दिवशी हालचालींना वेग आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत एकत्रितपणे लढण्याबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, आमदार रोहित पवार, आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीचा कौल आम्ही मान्य केला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही गोविंदबागेत एकत्र आलो. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या १२ जिल्ह्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतील, तर काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते.
केंद्र व राज्य पातळ्यांवर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर शिंदे यांनी ‘अजिबात नाही’ असे स्पष्ट केले. ‘आजकाल निवडणुका विकासकामांपेक्षा धार्मिक वाद, आर्थिक वाटप आणि सत्तेच्या वापरावर जास्त लढवल्या जात आहेत. याचा परिणाम निकालात दिसून आला,’ असेही त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका पराभवानंतर राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ही एकजूट कितपत प्रत्यक्षात उतरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निर्णय योग्य वेळी, स्थानिक परिस्थिती पाहून : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली. ‘मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. कृषक प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त गोविंदबागेत आलो होतो. तेथे शरद पवार होते. त्यानंतर एकत्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी गेलो. उद्घाटनानंतर प्रदर्शनाची पाहणी केली. मला शेतीची विशेष आवड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रदर्शनात जेवढी माहिती घेता येते तेवढी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत सध्या आम्ही महायुतीत आहोत. पुढील निर्णय स्थानिक पातळीवरील भौगोलिक परिस्थिती, राजकीय समीकरणे आणि पक्षांची ताकद पाहून योग्य वेळी घेतला जाईल,’ असे पवार म्हणाले. पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका पराभवाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मतदारराजा सर्वांत महत्त्वाचा असतो. भाजपला चांगले यश मिळाले आहे, त्यांचे अभिनंदन करतो. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करायचे असते. निकालाला अजून २४ तासही पूर्ण झालेले नाहीत. सर्वजण बसून नेमकी कारणे समजून घेऊ.’
जिल्हा परिषद निवडणुका प्राधान्याच्या : सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महानगरपालिका निवडणुकीतील कौल लोकशाहीचा भाग आहे, त्याचे आत्मचिंतन केले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत चर्चा सुरू आहे, बघूया काय होतंय ते. आत्ता जिल्हा परिषद निवडणुका अधिक महत्त्वाच्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत बंद दाराआड केलेल्या चर्चेच्या प्रश्नावर सुळे यांनी बंद दाराआड केलेली चर्चा बाहेर येते का, असा प्रतिसवाल करीत अधिक भाष्य करणे टाळले. तसेच त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत त्या म्हणाल्या, चर्चा चालूच असते. आता आधी लग्न काेंढाण्याचं, म्हणजे आता जिल्हा परिषद निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल बोलूया. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेत सक्षम, अनुभवी आणि जबाबदार लोक निवडून येणे गरजेचे आहे.’ पुण्याची जिल्हा परिषद देशात उत्तम काम करणारी आहे. त्या ठिकाणी जबाबदार योग्य लोकांना निवडून द्यायचे आहे. ज्यांना याचा खूप चांगला अनुभव आहे, त्यांनी निवडून जाऊन जिल्ह्याची आण-बान-शान जपावी, असे खासदार सुळे म्हणाल्या.
निकाल कमी-जास्त लागतात
ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपच्या महापालिका विजयाबद्दल अभिनंदन करत, ‘निकाल कमी-जास्त लागतात. त्यातून बोध घेऊन दुप्पट वेगाने काम करणे गरजेचे आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.
Web Summary : Following a municipal election defeat, NCP leaders met at Govindbag to discuss contesting upcoming Zilla Parishad and Panchayat Samiti elections together. Discussions focused on potential alliances and local strategies. Ajit Pawar emphasized a cautious approach, while Supriya Sule prioritized Zilla Parishad elections.
Web Summary : नगरपालिका चुनाव में हार के बाद, एनसीपी नेताओं ने आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में एक साथ लड़ने पर चर्चा करने के लिए गोविंदबाग में मुलाकात की। संभावित गठबंधनों और स्थानीय रणनीतियों पर ध्यान केंद्रित किया गया। अजित पवार ने सतर्क दृष्टिकोण पर जोर दिया, जबकि सुप्रिया सुले ने जिला परिषद चुनावों को प्राथमिकता दी।