इंदापूर :गुजरातमधीलअहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा विमानअपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचाअपघात झाला.अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाने उड्डाण केल्या-केल्या लगेचच मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळलं. विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. वृत्तसंस्था एएनआयनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते.
या विमान अपघातात विमानामधील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. या अपघातात एका दांपत्याचा मृत्यू झाला आहे. लंडनला असणाऱ्या मुलाची भेट घेण्यासाठी पहिल्यांदाच विमानवारी करणाऱ्या मूळचे ( ता.सांगोला,जि.सोलापूर) मधील दांपत्याचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे.अधिकच्या माहितीनुसार, महादेव तुकाराम पवार,आशा महादेव पवार असे या दांपत्याचे नाव आहे. ही दुर्घटना झाल्याचे समजल्यानंतर पुण्याहून अहमदाबादला जाण्यासाठी त्यांच्या मूळगावाहून पुण्याला निघालेले महादेव पवार यांचा पुतण्या सचिन पवार, पुतणी उषा चव्हाण व त्यांचे नातेवाईक काही काळ इंदापूरात थांबले होते. त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलतांना सविस्तर माहिती दिली.माध्यमांशी बोलतांना सचिन पवार म्हणाले,'महादेव पवार कामानिमित्त गुजरातमधील नडीयाद येथे रहात होते. त्यांचा मुलगा व आपला चुलतभाऊ शैलेश हा सात आठ वर्षांपासून लंडनमध्ये स्थायी असून तेथेच ते बेकरीचा व्यवसाय करत आहे. लेकाला भेटण्यासाठी हे दोघेजण पहिल्यांदाच विमानाने लंडनला निघाले होते.परंतू त्यांच्या नशीबात मुलाची भेट नव्हती. शैलेशचीही इच्छा होती की आई वडिलांनी लंडनला यायला हवे.पण ते होवू शकले नाही. महादेव पवार दर महिना दोन महिन्यातून हतीद या त्यांच्या मूळ गावी येत असत. आता ती भेट ही होवू शकणार नाही, हे सांगताना सचिन पवार यांना गहिवरुन आले.