भिगवण ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६० ते २५० रुपयांची दरवाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसणार आहे.खरीप हंगामात प्रामुख्याने मका, सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, बाजरी व मूग या पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणे बाजारपेठेत उपलब्ध झाले असून काही कंपन्यांचे मका बियाणे हे १०० ते २०० रुपयांनी महागले आहे मकाचे ४ किलो बियाणे पाकीट ८०० ते २२५० रुपयांपर्यंत आहेत तर कपाशीचे बियाणे पाकीट ४० रुपयांनी महाग झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत डीएपी वगळता अन्य खतांच्या बॅगमध्ये १८० ते २८० रुपयांची वाढ झाली आहे यामध्ये १२:३२:१६ या ग्रेडमध्ये वाढ झाली आहे. १०:२६:२६, १५:१५:१५, २०:२०:०:१३,यामुळे खरिप पेरणीचे बजेट वाढणार आहे.
कांद्याचे भाव किंचित वाढले
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात किंचित वाढ झाली आहे. आज, मंगळवारी १० किलो कांदा १८१ रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती सभापती निलेश स्वामी थोरात यांनी दिली. सध्या दमदार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम शेतीच्या कामावर झाला आहे. कांदाकाढणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी बहुतेक कांदा बराकीमध्ये साठवून ठेवला आहे. मात्र कांदा साठवून ठेवण्याची व्यवस्था नसलेले शेतकरी तो विक्रीसाठी आणू लागले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ५ हजार ३६५ पिशवी कांद्याची आवक झाली.कांद्याचे प्रती १० किलोंचे दर पुढीलप्रमाणे: सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा ६ १७० ते १८१ रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर १५० ते १६५ रुपये, सुपर मीडियम २ नंबर कांद्यास १३५ ते १२५ रुपये, गोल्टी कांद्यास ११५ ते १२५ रुपये, बदला कांद्यास ५० ते १०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली. कांद्याचे बाजारभाव किंचित वाढले असले तरी शेतकरी चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत असल्याचे व्यापारी संतोष पिंगळे यांनी सांगितले.