पुणे : गेल्या तीन दिवसांपासून खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला सव्वा महिना पुरेल. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा मंगळवारी सायंकाळी साडेसहा टीएमसी अर्थात २२.२६ टक्क्यांवर पोचला. खडकवासला हे धरण ५८.८८ टक्के भरले असून धरणांच्या परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणे १५ जुलैपर्यंत भरतील अशी स्थिती आहे.
शहर आणि परिसरात रविवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस खडकवासला धरण परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असून, यामुळे खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी अर्थात रविवारी धरणांत सकाळी ८ वाजेपर्यंत ५.२० टीएमसी अर्थात १७.८४ टक्के पाणीसाठा होता. रविवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली.
त्यानंतर या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चारही ५.४५ टीएमसी अर्थात १८.७० टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर सलग तीन दिवस पाऊस सुरू असून, मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा साठा साडेसहा टीएमसी अर्थात २२.२६ टक्क्यांवर पोचला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत एकूण सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. हा पाणीसाठा शहराला पुढील सव्वा महिना पुरेल इतका आहे. खडकवासला हे धरण ५८.८८ टक्के भरले असून, धरणांच्या परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणे १५ जुलैपर्यंत भरतील अशी स्थिती आहे.
धरण साठा (टीएमसी) टक्के
खडकवासला १.१६-५८.८८
पानशेत १.८४-१७.२५
वरसगाव ३.३१-२५.८५
टेमघर ०.१८-४.८९
एकूण ६.४९-२२.२६
यंदा धरणं लवकर भरणार
दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरतात; पण यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आणि जोरदार बरसला आहे. त्यामुळे धरणं लवकरच भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मिटेल, असा अंदाज आहे.