अनधिकृत नळजोड होणार अधिकृत
By Admin | Updated: June 24, 2015 05:24 IST2015-06-24T05:24:09+5:302015-06-24T05:24:09+5:30
शहरातील अनधिकृतपणे घेतलेल्या एक इंचापर्यंतचे सर्व नळजोड दंडात्मक कारवाई करून अधिकृत करण्याच्या प्रस्तावास दोन उपसूचनांसह महापालिकेच्या

अनधिकृत नळजोड होणार अधिकृत
पुणे : शहरातील अनधिकृतपणे घेतलेल्या एक इंचापर्यंतचे सर्व नळजोड दंडात्मक कारवाई करून अधिकृत करण्याच्या प्रस्तावास दोन उपसूचनांसह महापालिकेच्या मुख्यसभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. याकरिता ४ महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतरही कनेक्शन अधिकृत करून न घेतल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
शहरामध्ये अनधिकृतपणे घेण्यात आलेले नळजोड अधिकृत करण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभेत मांडण्यात आला. प्रस्तावाला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला. राष्ट्रवादी, भाजपाने याला पाठिंबा दिला. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ही योजना आणण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. त्यानंतर केवळ घरगुती एक इंचापर्यंतचे कनेक्शन अधिकृत करावे, या उपसूचनेसह या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
नियमानुसार जे नागरिक कर आणि पाणीपटट्ी भरतात, त्यांच्यावर यामुळे अन्याय होणार आहे. यामुळे यापुढील काळात बिनधास्त अनधिकृत कनेक्शन घ्या अन् नंतर ते अधिकृत करा, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होईल, अशी भीती उपमहापौर आबा बागुल यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पृथ्वीराज सुतार यांनीही याला विरोध दर्शविला.
यावर आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले, की शहर आणि हद्दीलगतच्या भागात होणारा असमान पाणीपुरवठा, वितरण व्यवस्थेमध्ये विषमता असल्याने ही योजना राबविणे आवश्यक आहे. अनधिकृत नळ कनेक्शनचा सर्व्हे करून त्याची माहिती एकत्रित करू. यापुढे सेवा हमी कायद्यामुळे नागरिकांना १५ दिवसांत नळजोड देणे बंधनकारक होणार आहे.’’ पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, की महापालिकेची अधिकृत नळजोड प्रक्रिया किचकट असल्याने अनधिकृत नळजोड घेण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होते. ही योजना राबवली, तर शहरातील सर्व अनधिकृत नळजोड दंड वसूल करून अधिकृत करता येईल.
बांधकाम व्यावसायिकांना या योजनेचा लाभ देऊ नये, तसेच यापुढील काळात अनधिकृत कनेक्शन घेऊ देऊ नयेत, जुन्या नळजोड असणाऱ्यांकडून पुन्हा नळजोड देण्यासाठी १२०० रुपये घेऊ नयेत.
अनधिकृत नळांचे सर्व्हेक्षण करण्यात यावेत, अशी मागणी सभासदांनी केली. सभागृहनेते शंकर केमसे, भाजपा गटनेते गणेश बीडकर, उपमहापौर आबा बागुल, बाबू वागस्कर, विशाल तांबे, धनंजय जाधव, अप्पा रेणुसे, शशिकांत सुतार, किशोर शिंदे, राजू पवार, अशोक ऐनपुरे यांनीही मते व्यक्त केली.
(प्रतिनिधी)