राजगड : लुक्यातील सुरवड–कोदवडी मार्गावरील गुंजवणी नदीवरील जुना लोखंडी पूल २० डिसेंबरला अवजड वाहनाच्या बोजामुळे कोसळल्याने परिसरातील सुमारे २५ गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला होता. या घटनेनंतर नागरिक, विद्यार्थी, कामगार व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने व प्रशासनाकडून अपेक्षित वेगाने हालचाली न झाल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी लोकसहभागातून पडलेल्या पुलाच्या बाजूने कच्चा पर्यायी रस्ता तयार केला होता. मात्र, निरा–देवघर प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी २१ जानेवारीला गुंजवणी धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या जोरदार विसर्गात हा पर्यायी कच्चा रस्ता पूर्णपणे वाहून गेला. परिणामी, २५ गावांचा संपर्क पुन्हा एकदा पूर्णतः ठप्प झाला आहे.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पूल कोसळून दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या राजगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून, पूल प्रश्नावर तातडीने निर्णय न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच कोणत्याही पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
यावेळी बाळू जाधव (सरपंच, सोंडे हिरोजी), रूपाली झांजे (माजी सरपंच, वडगाव झांजे), प्रकाश बढे (सोंडे सरपाले), युवराज कार्ले (सोंडे कार्ले), बापू खोपडे, संदीप सरपाले यांनी पूल दुर्घटनेनंतर दोन महिने उलटूनही ठोस पर्यायी व्यवस्था न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. परिसरातून तातडीने पूल दुरुस्ती व कायमस्वरूपी पुलाच्या उभारणीची जोरदार मागणी होत असून, प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : A bridge collapse on the Gunjwani River has isolated 25 villages for two months. Temporary fixes failed, sparking anger and threats of an election boycott if the issue isn't addressed.
Web Summary : गुंजवानी नदी पर पुल टूटने से 25 गाँव दो महीने से अलग-थलग हैं। अस्थायी समाधान विफल रहे, जिससे गुस्सा भड़क गया और मुद्दे का समाधान न होने पर चुनाव बहिष्कार की धमकी दी गई।