शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
By Admin | Updated: February 24, 2017 02:23 IST2017-02-24T02:23:22+5:302017-02-24T02:23:22+5:30
मिनी विधानसभा संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील जनतेने भाजपाला

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
प्रवीण गायकवाड / शिरूर
मिनी विधानसभा संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील जनतेने भाजपाला नाकारल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. अगदी भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांना शिरूर-ग्रामीण न्हावरे या हक्काच्या जि. प. गटात पराभवाचे तोंड बघावे लागले. जि. प.च्या सातपैकी सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, एका जागेवर लोकशाही क्रांती आघाडीच्या उमेदवार निवडून आल्या. भाजपाचा जि.प.त पूर्ण सफाया झाला. राष्ट्रवादीला पंचायत समितीत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपाने तीन जागा जिंकून आपली अब्रू वाचवली. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले.
विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षांनी झालेल्या जि. प., पं. स. निवडणुकीत भाजपाचीच लाट राहते की मतदार विरोधात जातात, याची प्रचंड उत्सुकता होती. कारण नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपाने ज्या पद्धतीने मुसंडी मारली, ते पाहता जि.प., पं.स. मध्येही मुसंडी मारते की काय अशी भीती कदाचित विरोधकांना असावी. मात्र, शेतीमालाला नसलेला भाव, नोटाबंदी यांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष ओळखून तालुक्यात राष्ट्रवादीने भाजपाविरोधी वातावरण तयार करण्यात यश मिळविले. शेतकऱ्यांनी अखेर मतदानातून भाजपाविषयीचा राग व्यक्त केला. परिणामी जि.प.त भाजपाचा या मतदारांनी पूर्ण सफाया केला.
आमदार पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल यांच्या रूपाने भाजपाला एकतरी जागा मिळेल अशी भाजपाची किमान अपेक्षा असेल; मात्र तीही फोल ठरली. पाचर्णे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने कमकुवत उमेदवार (राजेंद्र जगदाळे) दिला, अशी चर्चाही तालुक्यात रंगली. जगदाळे हे पाचर्णे यांच्यासमोर टिकणार नाही; एकतर्फी पाचर्णेंचा विजय होईल, असेही बोलले जात होते. मात्र या सर्व चर्चा फोल ठरवत जगदाळे यांनी बाजी मारली. माजी आमदार अॅड. अशोक पवार व बाजार समितीचे संचालक राजेंद्र जासूद यांची व्यूहरचना यशस्वी ठरली. जासूद यांचा जगदाळे यांच्या विजयात सिंहाचा वाटा आहे.
हक्काच्या भागात पाचर्णे यांना साथ मिळाली नाही. आमदार पाचर्णे यांनी स्वत: या गटात जातीने लक्ष घातले; मात्र त्यांना यश मिळाले नाही. पाचर्णे यांचे पुत्र शिरूर ग्रामीण महावरे गटात पराभूत झाले. मात्र शिरूर ग्रामीण भागात भाजपाचे आबासाहेब सरोदे विजयी झाले. या गणात पाचर्णे यांचे नेहमीच वर्चस्व राहिले. मात्र हा गण त्यांच्या पुत्रास विजयी करण्यास अपयशी ठरला. न्हावरे गणात राष्ट्रवादीच्या राणी शेंडगे या विजयी झाल्या. माजी आमदार अॅड. पवार यांनी तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राखताना तीन गटांत विजय खेचून आणला. वडगाव रासाई-मांडवगण फराटा गटात त्यांची पत्नी सुजाता पवार यांचा अपेक्षित विजय झाला. पाचर्णे यांचे खंदे सहकारी, तालुक्याचे नेते दादा पाटील फराटे यांच्या पत्नी छाया फराटे यांचा पवार यांनी पराभव केला. मांडवगण फराटा गणात मात्र राष्ट्रवादीच्या लतिका वराळे या अल्पमताने पराभूत झाल्या. एकेकाळी वराळे व आमदार पाचर्णे यांच्या कट्टर समर्थक होत्या. राजेंद्र गदादे यांच्या रूपाने या गणात भाजपाला एक जागा मिळाली.
आमदार पाचर्णे यांना आपल्या पुत्रास निवडून आणता आले नाही. तर माजी आमदार अॅड. पवार यांना आपल्या वडगाव रासाई-मांडवगण फराटा गटात पूर्ण वर्चस्व राखता आले नाही. (एक गण गेला) मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर स्वत:ची लोकशाही क्रांती आघाडी स्थापन करून या आघाडीच्या माध्यमातून तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गट व गणातून उमेदवार उभे केलेल्या मंगलदास बांदल यांनी तीनही जागा निवडून आणल्या. विशेष म्हणजे हा गट त्यांचा स्वत:चा गट नव्हता. मात्र, बांदल यांना आपल्या शिक्रापूर-सणसवाडी गटात कुसुम खैरे यांना निवडून आणण्यात अपयश आले. खैरे या भाजपाच्या उमेदवार होत्या. मात्र बांदल यांनी त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला.
बाळासाहेब खैरे यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून द्यावे, अशी बांदल यांची इच्छा होती; मात्र राष्ट्रवादीने कुसुम मांढरे यांना उमेदवारी दिली. खैरे सहानुभूतीच्या लाटेमुळे निवडून येतील व आपल्या पदरात एक जागा पडेल, या भावनेतून भाजपाने कुसुम खैरेंना उमेदवारी दिली. मात्र, भाजपाची ही खेळी सपशेल फोल ठरली. मांढरे या मोठ्या फरकाने निवडून आल्या. या गटातील दोन्ही गण राष्ट्रवादीने जिंकले.
रांजणगाव गणपती-कारेगाव गटात राष्ट्रवादीच्या स्वाती पाचुंदकर विजयी झाल्या. या गटात भाजपाने मनीषा पाचंगे यांच्या उमेदवारीतून कडवी लढत दिली. मात्र, माजी जि.प. सदस्य शेखर पाचुंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा युवकचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या नियोजनबद्ध व्यूहरचनेमुळे राष्ट्रवादीने ही जागा खेचून आणली. या गटातील रांजणगाव गणपती गणात मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. विक्रम पाचुंदकर यांच्या माध्यमातून भाजपाला पंचायत समितीची तिसरी जागा मिळाली. कारेगाव गणात राष्ट्रवादीने विजय मिळवला. राष्ट्रवादीने टाकळी हाजी-कवठे यमाई गटातही आपला यशाचा रथ यशस्वीपणे पुढे नेला. मात्र शिवसेनेच्या उमेदवार माधुरी थोरात यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता गावडे यांना विजयासाठी झगडण्यास भाग पाडले. १५व्या फेरीअखेर थोरात या ५०० मतांनी आघाडीवर होत्या. मात्र टाकळी-हाजी भागातील मतमोजणीत गावडे यांनी ही पिछाडी भरून काढून विजयश्री खेचून आणली.
माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या निमित्ताने गटावरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. मात्र कवठे येमाई गणात शिवसेनेचे डॉ. सुभाष पोकळे यांना रोखण्यात त्यांना अपयश आले. मागील निवडणुकीत गावडे यांनी पोकळे यांची पत्नी कल्पना पोकळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन निवडून आणले होते. या वेळी डॉ. पोकळे यांनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली व जिंकली. पाबळ-केंदूर गटातही शिवसेनेला मोठी अपेक्षा होती. भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयश्री पलांडे या अनुभवी व्यक्तीस शिवसेनेने उमेदवारी दिली होती. शिवसेनेने वातावरण निर्मितीही चांगली केली होती.