केंद्रातील मोदी सरकारनं महत्त्वाच्या शहराच्या नामांतराचा धडाका लावल्यानंतर महायुती सरकारनेही औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या तीन जिल्ह्यांचे नामांतर केले. याच पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. मात्र, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली. दरम्यान, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. तर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या नावाची मागणी केली जात आहे.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, "पुणे हे शैक्षणिक आणि आयटी हब मानले जाते. इतके महत्त्वाचे शहर असूनही स्थानकाची सध्याची परिस्थिती खूपच दयनीय आहे, ते सुधारले पाहिजे. राजधानी एक्सप्रेस देखील पुण्यातून जोडली पाहिजे, दिल्ली ते हैदराबाद एक्सप्रेस असो किंवा बेंगळुरू ते दिल्ली एक्सप्रेस, ती पुण्यातूनच गेली पाहिजे. नाशिक आणि बदलापूर सारख्या शहरांमध्ये जास्त कनेक्टिव्हिटी नाही. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पुण्याहून नाशिकला जाणारी कोणतीही ट्रेन नाही. शिवाय, पुणे स्थानकाचे नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावावर ठेवले पाहिजे, ज्यांनी इतकी युद्धे लढली आहेत आणि एकही युद्ध गमावले नाही. अशा महान योद्ध्याचे नाव या रेल्वे स्थानकाला दिले पाहिजे."
पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करताना श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे की, "मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे. पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. त्यांनीच पुणे शहर वसवले. त्यांनी जर हे केले नसते तर पुण्याची निर्मिती झाली असती का? पेशवे वगैरे शौर्य गाजवू शकले असते का? आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य चालू शकतो ही भावना राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केली. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव दिले पाहिजे. मेधा कुलकर्णी यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे", असेही ते म्हणाले
"पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव दिले पाहिजे अशी आपली पूर्वीपासूनची मागणी आहे. पुणे हे जगामध्ये विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते ते कुणामुळे? महात्मा फुले यांनी ती ओळख निर्माण केली. पुण्याला, महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावा असंच क्रांतिकारी काम महात्मा फुले यांनी केले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव दिले पाहिजे", अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. याचबरोबर पुणे रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी केली.