पुणे: भाळी चंदनाचा टिळा.. गळ्यात तुळशीच्या माळा.. डोक्यावर तुळशी वृंदावन अन् टाळ-मृदंगाच्या गजरात मुखी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात तल्लीन झालेल्या वैष्णवांचा मेळा शुक्रवारी शहरात दाखल झाला आणि अवघा रंग एकचि झाला, याची प्रचिती आली. जात, धर्म, पंथ असा सर्व भेद विसरून पुणेकरांनी संतांच्या सेवेत वाहून घेतले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातील संचेती चाैकात दाखल होताच शहरात चैतन्य संचारले. ‘चला पंढरीसी जाऊ । रखुमादेवीवरा पाहूं ॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान.. हा ध्यास मनी बाळगत विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वैष्णवांचा लाखोंचा मेळा शहरात दाखल झाला.
या लाखो वारकऱ्यांमध्ये मागील चार वर्षांपासून ४९ वर्षीय माऊली नाईक आपल्या आईला चालता येत नसल्यामुळे व्हीलचेअर आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मूळ मराठवाड्यातील असलेले माउली आईविषयी सांगतात, आईने ती लहान असल्यापासून वारीमध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभागी होते. आई मुक्ताबाई यांचे वय सध्या ९५ असून, तिला चालता येत नसल्यामुळे तिची इच्छा मी पूर्ण करत आहे.
व्हीलचेअरवर बसलेल्या आईला हाताने ढकलत पांडुरंगाच्या दर्शनासाठी संपूर्ण वारीचा प्रवास करणार आहे. अशा प्रकारे आईला व्हीलचेअरवरून नेऊन दर्शन घडवण्याच्या या घटनेने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले. उपस्थित भाविकांनी दोघांचं स्वागत केलं आणि हा प्रेमाचा, भक्तीचा क्षण मोबाइलमध्ये टिपण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. मुक्ताबाई म्हणाल्या, पाय चालत नाहीत; पण लेकराने मला हाताने पांडुरंगाचे दर्शन घडविण्याचा निश्चय केला आहे. यापेक्षा मोठं भाग्य कोणतं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.