इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नी राज्यमंत्र्यांकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:56+5:302021-03-15T04:11:56+5:30

इंदापूर : इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे काही दिवसांपासून तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नावर अपुरी व दिशाभूल करणारी माहिती ...

Minister of State misled by the issue of agricultural water in Indapur taluka | इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नी राज्यमंत्र्यांकडून दिशाभूल

इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नी राज्यमंत्र्यांकडून दिशाभूल

इंदापूर : इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे काही दिवसांपासून तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नावर अपुरी व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. मंत्रिपदावर व्यक्तीने कागदपत्रासह वस्तुनिष्ठ माहिती देणे गरजेचे आहे. गेली दीड वर्षे सत्तेवर असताना पोकळ घोषणा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक थांबवावी, अशी टीका भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, लाकडी-निंबोडी उपसा योजनेसाठी खर्च किती येणार आहे? अर्थसंकल्पात नक्की किती रक्कमेची तरतूद प्रस्तावित आहे. हे राज्यमंत्री का सांगत नाहीत. ह्या योजनेचे काम कधी सुरू होणार ? योजनेमध्ये इंदापूर तालुक्यातील ते म्हणतात त्याप्रमाणे ११ कोणती गावे आहेत ? शेतकऱ्यांना कधी पाणी मिळणार ? वीज बील शेतकरी भरणार? की शासन भरणार? तसेच या योजनेसाठी उजनी धरणातील किती पाण्याची तरतूद केली आहे? याची काहीच माहिती न देता योजना पूर्ण झाल्याच्या आविर्भावात राज्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन फक्त तकलादू व दिशाभूल व फसवणूक करणारी माहिती देत आहेत.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, लाकडी-निंबोडी योजनेचा मी पाठपुरावा करून सन २०१० ते २०१२ मध्ये सर्वे केला व आराखडा तयार करून उजनी धरणातून १ टीएमसी पाण्याची तरतूदतही केली होती. मात्र त्यावेळी राज्यात सिंचन घोटाळ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तत्कालीन राज्यपाल यांनी कोणत्याही नवीन सिंचन योजनेस परवानगी दिली नाही.

भाटघर, खडकवासल्याचे इंदापूर तालुक्याच्या हक्काचे सर्व पाणी सध्या शेतीसाठी राज्यमंत्री हे आमदार असताना व आता दीड वर्षे मंत्री असताना तालुक्यात देऊ शकले नाहीत. ते तालुक्यासाठी शेतीला जादा पाणी आणण्याचा प्रश्न कसा सोडवतील ? असा सवालही हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.

उजनी धरणातून शेटफळगढे येथे खडकवासला कालव्यात पाणी टाकण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे, अशी फसवी व दिशाभूल करणारी वक्तव्ये राज्यमंत्री पदावरील जबाबदार व्यक्ती करीत असल्याचा आरोपही त्यांनी केल.

दीड वर्षात भाटनिमगाव बंधाऱ्यांची दुरुस्ती नाही

हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न सोडविण्याच्या गप्पा मारणाऱ्या राज्यमंत्र्यांना मंत्रिपदावर आल्यानंतर दीड वर्षात साध्या भाटनिमगाव बंधाऱ्यांची दुरुस्ती करता आली नाही. सध्या हा बंधारा दुरुस्त न केल्याने पाण्याअभावी कोरडा पडला आहे. तालुक्याचा निधीचा महापूर आला आहे, अशी स्वतः टिमकी वाजविणाऱ्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करणे थांबवावे,अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

Web Title: Minister of State misled by the issue of agricultural water in Indapur taluka