मावळ ( पिंपरी चिंचवड) - पुणे जिल्ह्यातील मावळ येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. यात बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी तळेगाव पोलीस,पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, पी एम आर डी ए अग्निशामक दल, लष्कराचे एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत आहे.
यावेळी रोहित पवार म्हणाले, आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत कशी मिळेल असा आहे. जे लोक अडकलेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नदीपात्रात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रोहित पवार यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं तर २० ते २५ जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात २७० जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न करणारी ही दुसरी दुर्घटना घडली. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरुप परतावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना! मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.