माळेगांव -भारतातील शेतकरी ज्यावेळी कर्जाखाली दबलेला होता,पिचलेला होता. शेतकरी राजा कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने महाराष्ट्रात अनेक आत्महत्या होत होत्या.यामुळे शरद पवार हे आत्महत्यांमुळे अतिशय अस्वस्थ झाले.शेतकरी आत्महत्यांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत होती .अशावेळी शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी पाठपुरावा केला.त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या सरकारने भारतातील शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी कर्ज शरद पवार यांच्या आग्रहामुळे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला,असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या बळीराजा सहकार पॅनल प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या.यावेळी सुळे यांनी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि खास करून माळेगाव कारखान्यासाठी अनेक प्रकल्प उभे केले. अनेक वेळा कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली. माळेगाव कारखान्याला संलग्न इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांना पवार चॅरिटेबल ट्रस्टकडून देणगी देण्यात आली.
साहेबांचा हा निर्णय दूरदृष्टीचा होता,त्यामुळे आज सभासदांची अनेक मुलं मुली देशात व परदेशात नोकरी व्यवसाय करीत आहेत.शरद पवार यांनी त्यांच्या अनेक समकालीन सहकाऱ्यांसह कारखान्याची विस्तारवाढ केली.त्यामध्ये श्रीरंग अण्णा जगताप,भीमदेवराव गोफणे,चंद्रराव तावरे, नारायण पाटील देवकाते,नामदेवराव आटोळे,शिवाजीराव ढवाण,बापूसाहेब महाराज जाधवराव या सहकाऱ्यांसह माळेगाव कारखाना नावारूपाला आणल्याचे सुप्रिया सुळे यांनी आवर्जून सांगितले.जिरायत भागातील जानाई-शिरसाई योजना आणली आणि त्याचे पाणी उंडवडी,सोनवडी,कारखेल व बऱ्हाणपूर सह इतर गावांना दिले.त्यामुळे तेथील शेतकरी समृद्ध झाल्याचे त्या म्हणाल्या.
आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राजकारण करतो,सत्ता सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात दिली पाहिजे,त्या सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,हा विचार चव्हाणसाहेबांनी मांडला.मात्र,दुर्दैवाने महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही.त्यामुळे संबधितांनी चव्हाणसाहेेबांचं नाव वापरायच का नाही,हे ठरवावे,असा टोला सुळे यांंनी लगावला.यावेळी युगेंद्र पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस`थित होते.