आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:39+5:302021-06-09T04:14:39+5:30
कालिदास नगरे लोकमत न्यूज नेटवर्क पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू ...

आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू
कालिदास नगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. या कंपनीच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचे आम्ही लवकरच पुनर्वसन करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची परिस्थिती तीव्रता भयानक होती की या कंपनीमधील सर्व जळून खाक झाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बच्चू कडू म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील राज्यातील ही सर्वात मोठी व गंभीर घटना आहे. कामगारांच्या सुरक्षेची कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ज्या कामासाठी परवानगी घेतली होती, त्याऐवजी दुसरेच उत्पादन या ठिकाणी सुरू असल्याचे दिसत आहे, तर या घटनेची योग्य ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
मृत पावलेल्या कामगारांना योग्य ती मदत मिळवून दिले जाईलच. सर्व कामगार हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मदत तर दिली जाईलच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यांचे पुर्नवसन केले जाईल. कंपनीच्या निष्काळजीपणाच या घटनेला कारणीभूत असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
फोटो ओळ : पिरंगुट येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एस.व्ही.एस कंपनीची पाहणी करताना राज्यमंत्री बच्चू कडू.