खानवटेकरांचा वाळूउपशाला विरोध
By Admin | Updated: August 18, 2015 03:43 IST2015-08-18T03:43:44+5:302015-08-18T03:43:44+5:30
येथील नदीपात्रात यापुढे काही झाले, तरी वाळूउपसा होऊ द्यायचा नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठरावही यापुढे दिला जाणार नाही, अशी

खानवटेकरांचा वाळूउपशाला विरोध
राजेगाव : खानवटे (ता. दौंड) येथील नदीपात्रात यापुढे काही झाले, तरी वाळूउपसा होऊ द्यायचा नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठरावही यापुढे दिला जाणार नाही, अशी भीमप्रतिज्ञा नागरिकांनी ग्रामसभेत केली. सरपंच बबनराव धायतोंडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत उपस्थित सर्वच नागरिकांनी बहुमताने वाळूउपसा करण्यासाठी लिलावाला विरोध करण्याचा ठराव मंजूर केला.
या आर्थिक वर्षामध्ये शासनाच्या आदेशानुसार वाळू लिलाव करण्याचे पत्र तहसीलदारांना दि. २३/६/२०१५ रोजी आले होते. या पत्रानुसार ग्रामसभेत वाळू लिलाव करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेस उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली. तेव्हा ग्रामसभेतील उपस्थित नागरिकांनी ओव्हरलोड वाळू वाहतुकीने खराब होणाऱ्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपाय म्हणून वाळू वाहतुकीने नादुरुस्त झालेला रस्ता हा शासनाकडून प्रथम मंजूर करून घ्यावा व तो दुरुस्त करून घ्यावा, असे सर्वानुमते ठरले. ग्रामसभेत शाहूराजे राजेभोसले यांनी उभे राहून लिलाव होऊ देऊ नये व इतर ठिकाणचा बदली भूखंड म्हणूनदेखील खानवटे गावच्या नदीपात्रातील वाळूउपसा होऊ नये, अशी सूचना मांडली. या सूचनेला ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी वाळू लिलावला विरोध केला. तसेच, २०१५-२०१६ या वर्षात कोणत्याही परिस्थितीत वाळू लिलाव होऊ देऊ नये, असे सर्वानुमते ठरले. गतवर्षी झालेल्या वाळू लिलावातील ३0 टक्के रक्कम लवकरात लवकर ग्रामपंचायत खाती वर्ग करण्यात यावेत, हा विषय मांडला. अॅड. किशोर माहूरकर यांनी याला अनुमोदन दिले. या वेळी सरपंच बबनराव धायतोंडे, उपसरपंच शंकर पवार, ग्रामसेवक डी. बी. शिंदे, दौंड तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष हनुमंत कन्हेरकर,शाहूराजे राजेभोसले, अॅड. किशोर माहूरकर, राजेंद्र झोंड, शरद ढवळे, अंकुश माहुरकर, बापू थोरात, संतोष लोंढे, रवी भोसले आदी उपस्थित होते.
याबाबत सरपंच बबनराव धायतोंडे म्हणाले, की गावातील जनतेने सर्वसंमतीने घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीला मान्य राहील. ३० टक्के रक्कम मिळण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. ती रक्कम मिळाल्यानंतर त्या रकमेचा उपयोग गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे पूर्णपणे वापरला जाईल.