जेईई मेन्सचा कटआॅफ घसरला
By Admin | Updated: April 28, 2017 06:06 IST2017-04-28T06:06:51+5:302017-04-28T06:06:51+5:30
जेईई मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या कटआॅफमध्ये १९ गुणांनी घट झाली आहे.

जेईई मेन्सचा कटआॅफ घसरला
पुणे : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या कटआॅफमध्ये १९ गुणांनी घट झाली आहे. मागील ४ वर्षांच्या तुलनेत ३२ गुणांनी कटआॅफमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. जेईई परीक्षेचा कटआॅफ ८१ इतका लागला आहे. देशभरातून या परीक्षेसाठी १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यापैकी महाराष्ट्रातील १ लाख ३६ हजार विद्यार्थी, तर पुण्यातून साधारण १५ हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अक्षत चौघ हा राज्यभरातून प्रथम क्रमांकाने पात्र ठरला आहे तर देशभरातून त्याला ७वा रँक मिळाला आहे.
जेईई मेन्स २०१७मध्ये मिळालेले गुण आणि आॅल इंडिया रँक्सचा उपयोग विविध एनआयटीज, आयआयटीज आणि सीएफटीआयजच्या प्रवेशाकरिता होणार आहे. यंदा निवडणुकांमुळे १२ वी बोर्ड परीक्षांना उशीर झाला, त्यामुळे जेईई मेन्स परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे यंदा कटआॅफ गुणांमध्ये घट झाल्याची शक्यता आहे. जेईई मेन्स ही परीक्षा ३६० गुणांची होती, त्यामध्ये खुल्या गटातून पात्र होण्यासाठी ८१ गुण, ओबीसी-एनसीएलकरिता ४९ गुण, एससीकरिता ३२ गुण आणि एसटी करिता २७ गुण आहे. जेईई पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख २० हजार इतकी आहे. कटआॅफ घसरल्याने २०१६च्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांची संख्या २० हजाराने वाढली आहे. ही परीक्षा २०१३ ते २०१५ या कालावधीमध्ये अनिवार्य होती. यंदा २०१७मध्ये एमएचटी-सीईटी ही परीक्षा महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुख्य धरून या ६५ टक्के राज्य कोटा या परीक्षेच्या माध्यमातून ठरविला जाणार होता. यामुळे परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारापर्यंत खाली आली आहे.
चाटे ज्युनिअर कॉलेजचे ४५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. बाकलीवाल ट्युटोरिअल्सचे ३५० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे ३०५ हून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)