लोणावळा स्वीकृत नगरसेवकपदी जाधव, कविश्वर, आगरवाल
By Admin | Updated: January 12, 2017 02:44 IST2017-01-12T02:44:33+5:302017-01-12T02:44:33+5:30
लोणावळा नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत) नगरसेवकपदी भाजपाच्या गटातून जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब

लोणावळा स्वीकृत नगरसेवकपदी जाधव, कविश्वर, आगरवाल
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत) नगरसेवकपदी भाजपाच्या गटातून जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब जाधव, काँग्रेसच्या गटातून निखिल कविश्वर, तर शिवसेनेच्या गटातून अनपेक्षितपणे नितीन आगरवाल यांनी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नगर परिषद सभागृहात बुधवारी निवडप्रक्रिया पार पडली. पक्षीय बलानुसार भाजपा नऊ सदस्य संख्या (गटनेता भरत हारपुडे), काँग्रेस सहा सदस्य संख्या (गटनेता आरोही तळेगावकर), शिवसेना दहा सदस्य संख्या (गटनेता शादान चौधरी), महालक्ष्मी शहर विकास पार्टी यांची सदस्य संख्या तीन (गटनेता सेजल परमार), आरपीआय गट सदस्य संख्या एक व अपक्ष गट सदस्य संख्या एक असे गट तयार करण्यात आले आहेत. यापैकी अपक्ष गटाचे राजू बच्चे यांनी स्वीकृत नगरसेवकसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला. आरपीआय गटाचे दिलीप दामोदरे यांनी मित्रपक्ष भाजपाला पाठिंबा दिला. भाजपाच्या वतीने जाधव व विनय विद्वांस ही नावे दिली होती. गटनेते हारपुडे यांनी पीठासन अधिकारी यांच्याकडे जाधव यांच्या नावाचे शिफारसपत्र दिले. काँग्रेसतर्फे कविश्वर यांच्या नावाची शिफारस गटनेत्या तळेगावकर यांनी केली होती. शिवसेनेच्या वतीने आगरवाल व सौम्या शेट्टी ही नावे देण्यात आली होती. गटनेत्या चौधरी यांनी आगरवाल यांच्या नावाचे शिफारस पत्र दिले. महालक्ष्मी गटाकडून बाबु येंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, त्यांची सदस्य संख्या तीनच असल्याने तो अर्ज बाद ठरविण्यात आला. निवडीनंतर स्वीकृत नगरसेवकांची मिरवणूक काढली होती. (वार्ताहर)
शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत गटनेत्या झालेल्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नगरसेविका शादान चौधरी यांनी नामनिर्देशित सदस्यांची निवड करताना निष्ठावंत शिवसैनिकांना डावलत माजी नगरसेवक आगरवाल यांच्या नावाचे शिफारस पत्र दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेने चौधरी यांना सर्व मतभेद बाजूला ठेवत पक्षात घेतले. मात्र गटनेते झाल्यावर त्यांनी शिवसैनिकांना ठेंगा दाखविला असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या पाठबळामुळेच निष्ठावानांवर अन्याय झाल्याचा संतप्त आरोप काही जणांनी केला.