आयटी कंपन्यांच्या अंतर्गत सुरक्षेबाबत सूचना मागविणार
By Admin | Updated: February 2, 2017 04:17 IST2017-02-02T04:17:14+5:302017-02-02T04:17:14+5:30
शहरातील आयटी कंपन्यांमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेबाबत सर्वांकडून सूचना मागवून सुधारित नियमावली तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे़ ही नियमावली आयटी

आयटी कंपन्यांच्या अंतर्गत सुरक्षेबाबत सूचना मागविणार
पुणे : शहरातील आयटी कंपन्यांमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेबाबत सर्वांकडून सूचना मागवून सुधारित नियमावली तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ही नियमावली आयटी कंपनीच्या प्रमुखांबरोबर चर्चा करून त्यांना लेखी स्वरूपात देण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
कंपनीत जाणाऱ्या आयटीतील तरुणीचे अपहरण करून कॅबचालकाने तिच्यावर अत्याचार करून खून करण्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती़ त्यानंतर शहर पोलीस दलाने आयटी कंपन्यांसह ज्या कंपन्या कॅबद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांची ने-आण करतात, त्यांच्यासाठी सुरक्षा नियमावली तयार केली होती़ तेव्हापासून तरुणींना सर्वांत शेवटी सोडले जात नाही किंवा सर्वप्रथम त्यांना घेतले जात नाही़ इन्फोसिस कंपनीमध्ये रसिला राजू ओपी हिचा सुरक्षारक्षकानेच खून केल्याने या कंपन्यांमधील अंतर्गत सुरक्षेविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे़.
याबाबत रश्मी शुक्ला यांनी सांगितले, की कंपनीच्या आतमध्ये ही घटना घडली असून अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेने नेमून दिल्यानुसार काम केले नसल्यानेच ही घटना घडली असल्याचे दिसून येत आहे़ याबाबत काय काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी सूचना करण्याचे आपण आवाहन केले आहे़ त्यानुसार लोकांकडून मोठ्या प्रमाणावर सूचना येऊ लागल्या आहेत़ सध्या असलेले सुरक्षाविषयक नियमावलीत अजून काय बदल करता येईल, यासाठी या सूचनांचा विचार करण्यात येईल़ त्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनियम करून नव्याने नियमावली तयार केली जाईल़ त्यानंतर पुणे शहरात असलेल्या सर्व आयटी कंपन्यांचे प्रमुख, त्यांचे मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांच्याकडूनही सूचना मागविण्यात येईल़ त्यानंतर त्यांना सुरक्षाविषयक नवीन नियमावली लेखी स्वरूपात देण्यात येईल़महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या सूचना येत असून एका तरुणीने खूप चांगली सूचना केली आहे़ कंपनीतील प्रत्येकाला ओळखपत्र दिले जाते़ या ओळखपत्रावर एखादा डिव्हाईस लावून त्याला बटण दिले तर संकटकाळी ती कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेला कळवू शकेल़ (प्रतिनिधी)