बेपत्तांचा लागेना तपास
By Admin | Updated: January 9, 2017 03:11 IST2017-01-09T03:10:43+5:302017-01-09T03:11:25+5:30
पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते चार अल्पवयीन

बेपत्तांचा लागेना तपास
पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते चार अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडू लागल्या आहेत. बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडून तपास लागण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.
पिंपळे गुरव परिसरातून १६ वर्षांची युवती बेपत्ता होऊन वर्ष उलटले, तरीही काही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना भेटून आपली व्यथा मांडली. सांगवी पोलिसांकडून मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशी नातेवाइकांची तक्रार आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे संबंधित संशयित आरोपीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. स्वप्नाली मनोज मल्लाव (वय १६, रा. काची चाळ, दापोडी) असे त्या बेपत्ता युवतीचे नाव आहे. स्वप्नाली ही दापोडीमधील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शिक्षण घेत होती. स्वप्नालीचे काही बरे-वाईट झाले नाही ना, अशी भीती नातेवाईक व्यक्त करत आहेत.
कोणाचा तरी फोन आला अन् बाहेर गेलेला विनायक महिंद्रा खांडेकर हा १७ वर्षांचा तरूण १ जानेवारीला संत तुकारामनगर येथील घरातून बाहेर पडला असून अद्याप तो परतला नाही. त्याचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. संतोष सिद्धराम धोत्रे हा गणेशनगर, पिंपळे निलखमधून
बेपत्ता झाला. १६ डिसेंबर २०१६ ला बेपत्ता झालेला संतोष अद्याप घरी परतला नाही. अशा बेपत्ता होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. मोबाइल लोकेशन, तसेच कॉल रेकॉर्डच्या आधारे अशा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे शक्य असताना, पोलिसांकडून मात्र तातडीने हालचाली होत नाहीत. (प्रतिनिधी)
संशय व्यक्त केल्यानंतरही पोलिसांची उदासीनता
फूस लावून पळवून नेणाऱ्यांवर नातेवाइकांनी संशय व्यक्त केल्यानंतरही पोलीस संशयितांची कसून चौकशी करत नाहीत. संशयित व्यक्तींची नावे दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास अशा बेपत्ता अथवा अपहरण केलेल्या व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो. पोलिसांकडून अशा घटनांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने वेळीच बेपत्ता व्यक्तींचा तपास लागत नाही. अशा व्यक्तींचा घातपात घडवून आणल्याचे नंतर निष्पन्न होते. वेळीच पोलिसांनी गंभीर दखल घेतल्यास अशा घटनांचा उलगडा होईल. संकटात असलेल्या व्यक्तीला मदत मिळू शकेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.