इंदापूरचा ३० वर्षांपासुन धगधगणारा पाणीप्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:33+5:302021-04-25T04:10:33+5:30
कळस : इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या पाणी प्रश्नांना मंजुरी मिळाल्याने पाणी प्रश्नांवरून होणारे राजकारण आता थांबणार आहे. प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरून ...

इंदापूरचा ३० वर्षांपासुन धगधगणारा पाणीप्रश्न मार्गी लागणार
कळस : इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या पाणी प्रश्नांना मंजुरी मिळाल्याने पाणी प्रश्नांवरून होणारे राजकारण आता थांबणार आहे. प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरून राजकारण तापत होते. गेली ३० वर्षांपासून धगधगणाऱ्या खडकवासला कालव्यावरील ३६ गावांचा व निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न उजनीवरील उपसा सिंचनाला मंजुरी मिळाल्याने आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण होण्याचे संकेत आहेत.
तालुक्यातील निवडणुकीत पाणीप्रश्न हा नेहमीच गाजतो. मात्र, तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री भरणे यांनी या प्रश्नाला प्राधान्य देण्याचे ठरवून पाठपुरावा केला. त्यामुळे अर्थसंकल्पात लाकडी निंबोडी उपसिंचनासाठी तरतूद करून खडकवासला व निरा डावा कालव्यावरील उजनी उपसाला मंजुरी मिळवून पाणीप्रश्न निकालात काढला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकल्प पूर्ण होणार असल्याने भरणे यांना त्याचा मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. कालव्याला पाणीही कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला होता. तसेच खडकवासला धरणसाखळीतील पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण हा वाद विकोपाला जात होता. तालुक्यांमधील सुमारे २० हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबून आहे. शहराच्या वाढत्या पाणी मागणीमुळे या भागातील फळबागा व शेती अडचणीत येत होती. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते. महत्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला दिली जात होती. इंदापूर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबून आहेत.
शेतीव्यवस्था बारमाही सिंचनाअभावी संकटात होती. या भागातील द्राक्षे, डाळिंब, ऊस, फूलशेती नेहमीच अडचणीत राहिली. तसेच पिण्याच्या पाण्याचीही अवस्था उन्हाळ्यात गंभीर होत होती. नवीन उपसा सिंचनमुळे शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावांमधील क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार आहे.
तसेच खडकवासला कालव्यावरून सणसर जोड कालव्यामधून २२ गावांना पाणी देण्यासाठी अनेक संघर्ष झाला. अनेक वेळा आंदोलने झाली, मात्र अंथुर्णेपासून पुढे २२ गावांना बारमाही पाणी मिळवण्यासाठी गेली ३० वर्षे लढा चालू होता. मात्र खडकवासला धरणसाखळीत पाणी कमी राहत असल्याने अडचणी येत होत्या. आता या गावानाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.