यंदा प्रथमच आदर्श मतदान केंद्र संकल्पना
By Admin | Updated: January 9, 2017 03:06 IST2017-01-09T03:06:55+5:302017-01-09T03:06:55+5:30
राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रातील तयारीपासून ते मतदारांना मतदार स्लिप वाटपाचे नियोजन केले आहे.

यंदा प्रथमच आदर्श मतदान केंद्र संकल्पना
पिंपरी : महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रातील तयारीपासून ते मतदारांना मतदार स्लिप वाटपाचे नियोजन केले आहे. एका मतदान केंद्रावर ७५० ते ८०० मतदारांची संख्या असणार आहे. या वर्षीपासून मतदान केंद्रासाठी आदर्श मतदान केंद्र निवडण्यात येणार आहे. मानांकन देण्यात येणार आहे.
राज्यभरातील सुमारे १० महापालिकांची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मतदारयादी फोडण्याचे काम सुरू आहे. तसेच केंद्रावरीलही नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे मतदारांची संख्या ७५० ते ८०० मतदार प्रतिकेंद्र आहे. महापालिका निवडणुकीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या मतदान केंद्राबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्रनिहाय मतदारांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची यादी निश्चित करून त्याबाबत योग्य ती उपाययोजना केली जाईल.
मतदान केंद्राची पाहणी
महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून या मतदान केंद्रावर व्यवस्थित खोल्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, रॅम्प, सुरक्षा भिंत आदी सुविधा असल्याबाबत खात्री करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठीचे नियोजनही केले आहे.
वीजपुरवठ्याबद्दल दक्षता
महापालिका हद्दीत आदर्श मतदान केंद्र तयार करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवाव्यात. शक्यतो सर्व मतदान केंद्र ही आदर्श मतदान केंद्राच्या धर्तीवर तयार करावीत, निवडणुकीसाठी
वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तयार करून ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमची व्यवस्था करावी. मतदान व मतमोजणी दिवशी संबंधित ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
मान्यतेनंतरच बिनविरोध उमेदवाराची घोषणा
निवडणूक आचारसंहिता आणि नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेचा निवडणूक विभाग काम करीत आहेत. तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी या वेळसचे नियोजनही निवडणूक विभाग करीत आहे. उमेदवारीअर्ज माघारी घेताना एक उमेदवार सोडून इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यास अशा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराच्या नावाची तत्काळ घोषणा केली जाणार नाही.
संबंधित उमेदवाराने इतर उमेदवारांवर दबाव आणून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे असे प्रसंग घडल्यास निवडणूक आयोगाला तत्काळ सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच संबंधित उमेदवाराला विजयी जाहीर केले जाणार आहे.