पुणे : परिसरातील ११ गावांना महापालिकेत समाविष्ट करून विकासासाठी एक पैसाही न देता भारतीय जनता पार्टीने त्यांची चेष्टा चालवली आहे. या प्रत्येक गावासाठी १०० कोटी रुपये याप्रमाणे एकूण ११०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या गावांमधील नागरिकांना बरोबर घेऊन महापालिकेवर सोमवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला.खासदार सुळे मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, नवनिर्वाचित गटनेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, बाळासाहेब बोडके; तसेच सचिन दोडके, प्रकाश कदम व पक्षाचे अन्य नगरसेवक, पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चा काँग्रेस भवनजवळ आल्यानंतर तुपे, बराटे, तांबे, धनकवडे आदी नेत्यांनी काँग्रेसभवनमध्ये जाऊन महात्मा गांधी, तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड हेही काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत आंदोलनात सहभागी झाले. गावांचे समाधान होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांना तुपे यांनी दिला.कर वसूल करता, मग विकासकामेही कराखासदार सुळे यांचे महापालिका प्रवेशद्वारावर भाषण झाले. त्यांनी राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, गावांमधून कर वसूल करता, तर तिथे विकासकामेही करायला हवीत. सरकारने गावांचा समावेश करून दिला व विकासकामांसाठी एक छदामही दिला नाही.विकास आराखडा तयार करण्याचे काम शिष्टमंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रशासन या गावांचा विकास आराखडा तयार करत असून, तत्पूर्वी तिथे कामांना सुरुवातही केली आहे, असे उगले यांनी सांगितले. अंदाजपत्रकात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातून सर्व गावांमध्ये समान विकासकामे करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
समाविष्ट गावांच्या विकासासाठी ११०० कोटी द्या- सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 04:17 IST