राज्यात गॅसटंचाईचा कल्लोळ; चुलीवर स्वयंपाकाची वेळ, हॉटेलवाल्यांची तारांबळ, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा
By अजित घस्ते | Updated: March 13, 2026 05:51 IST2026-03-13T05:51:18+5:302026-03-13T05:51:54+5:30
कोळशाची माेठ्या प्रमाणात मागणी

राज्यात गॅसटंचाईचा कल्लोळ; चुलीवर स्वयंपाकाची वेळ, हॉटेलवाल्यांची तारांबळ, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा
अजित घस्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना बसत असून, पर्यायी इंधन म्हणून आता लाकूड आणि कोळशाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.
वाढत्या मागणीमुळे या साहित्यात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. महागाईत जगायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. पुन्हा एकदा ‘चूल आणि बोळके’ असे चित्र पाहायला मिळत असून, प्रशासनाने गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
व्यावसायिक अडचणीत
हॉटेल व्यावसायिक अडचणीत असल्याने काळ्या बाजाराने मिळणारा ५ हजारांचा गॅस सिलिंडरही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आजही व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून घरगुती गॅसचा छुपा वापर केला जात होता.
बाहेरील जेवणावर भिस्त
‘गॅस बुक करूनही सिलिंडर मिळत नाही. घरामध्ये स्वयंपाक कसा करायचा? हा प्रश्न आहे. नाईलाजास्तव बाहेरून जेवण मागवावे लागते किंवा लाकडावर पाणी तापवावे लागत आहे,’ अशी व्यथा गृहिणींनी मांडली.
हॉटेलधारक धास्तावले, कामगारवर्गात चिंता
संगमनेर : संगमनेर शहर आणि तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय बंद होण्याची भीती वाटू लागली आहे. सध्याची परिस्थिती कोरोना संकटाची आठवण करून देणारी वाटत असल्याचे व्यावसायिकांकडून बोलले जात आहे. गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक बाजारपेठ धोक्यात आली आहे. संगमनेर शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक उपाहारगृह आणि हॉटेल बंद करावी लागतील काय?, अशी भीती व्यावसायिकांमधून व्यक्त हाेत आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा असून नियमित गॅस टाक्या घेऊन वाहने येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये. त्यांना टाक्या नियमित मिळतील असे निर्देश गॅस एजन्सीजना दिले आहेत.
रसिक सातपुते, पुरवठा अधिकारी
एलपीजी निर्यातीवर कोर्टाची नाराजी
नागपूर : अमेरिका-इराण युद्धामुळे देशातील नागरिक एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याला तोंड देत आहेत. असे असताना कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनी एलपीजी निर्यातीवर भर देत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली.
अनेक मेन्यूवर कपात
उपहागृह, हॉटेलमध्ये पदार्थांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. जेथे अनेक पदार्थ मिळायचे तेथे आता अगदीच बोटावर मोजता येतील इतकेच पदार्थ तयार केले जात आहेत.