ग्रामसभांत खडाजंगी
By Admin | Updated: August 17, 2015 02:56 IST2015-08-17T02:56:09+5:302015-08-17T02:56:09+5:30
रेशनिंग दुकान, अन्नसुरक्षा योजना, दारिद्र्यरेषेखालील यादी, वाळू लिलाव, वनजमिनींमधील अतिक्रमण आदी मुद्द्यांवरून हिवरेतर्फे नारायणगाव येथे झालेली ग्रामसभा गाजली.

ग्रामसभांत खडाजंगी
खोडद : रेशनिंग दुकान, अन्नसुरक्षा योजना, दारिद्र्यरेषेखालील यादी, वाळू लिलाव, वनजमिनींमधील अतिक्रमण आदी मुद्द्यांवरून हिवरेतर्फे नारायणगाव येथे झालेली ग्रामसभा गाजली. वनविभागाकडून नारायणगड परिसरातील वनजमिनींमधील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई केली जात नसल्याने वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा या वेळी निषेध करण्यात आला.
शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिवरे तर्फे नारायणगाव येथे झालेल्या ग्रामसभेत विविध मुद्द्यांवरून चांगलाच गदारोळ झाला. रेशनिंग दुकानावरील सेल्समन बदलणे, अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींची जुनी यादी रद्द करून पुन्हा नव्याने लाभार्थी यादी तयार करणे, नारायणगड परिसरातील वनजमिनींमध्ये लोकशासनच्या आंदोलकांनी केलेले अतिक्रमण काढणे, नदीपात्रातील वाळू उपसण्यासाठी परवानगी न देणे आदी विषयांवर खडाजंगी होऊन ही ग्रामसभा पार पडली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीराताई भांगरे होत्या. या वेळी उपसरपंच सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र खोकराळे, दत्तानाना भोर, शिवदास विधाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक भोर, पोलीसपाटील विलास खोकराळे, सोसायटीचे चेअरमन रोहिदास भोर, बाबाजी शिंदे, संतोष खोकराळे, अर्जुन शिंदे, शिवदास खोकराळे, मयूर खोकराळे, नीलेश खोकराळे, गहिना भोर, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, सचिव डॉ. संतोष वायाळ, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य निखिल डोंगरे, सुधीर खोकराळे, सुधीर शिंदे, गावकामगार तलाठी शीतल गर्जे, ग्रामसेविका आर. आर. इनामदार, कृषी अधिकारी सौ. पंधे, वनपाल ए. एन. सोनवणे, वनरक्षक डी. के. डोके यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीरा : पुुरंदर तालुक्यातील नीरा नजिक आदर्श सांसद ग्राम असलेल्या गुळूंचे गावच्या सरपंच रत्नमाला जगताप आणि त्यांचे पती सुरेश जगताप यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तसेच सरपंच आणि त्यांच्या पती आणि दोन्ही मुलांनी एका वृध्द महिलेसह तिच्या विवाहित मुलीला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी नीरा पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. स्वातंत्र्यदिनी गुळूंचे गावच्या ग्रामसभेनंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ही घटना घडली.
नीरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार - स्वातंत्र्यदिनी गुळूंचे गावची ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच रत्नमाला जगताप ह्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर येत असताना संजीवनी शशिकांत निगडे आणि त्यांची विवाहित मुलगी स्मिता गणेश देशमुख (रा. क्षेत्रमाहुली, सातारा) या दोघींनी आम्हाला ग्रामसभेत आमचा विषय मांडावयाचा आहे, असा आग्रह धरला़ सरपंच रत्नमाला जगताप यांनी ग्रामसभा संपली असल्याचे त्यांना सांगितले.
पिंपळवंडी : भावकीचा वाद गावकीत आल्यामुळे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी आयोजिण्यात आलेल्या ग्रामसभेला वेगळीच कलाटणी मिळाली. तंटामुक्त समितीचा अध्यक्ष कोण? यावरूनच वाद झाल्यामुळे पिंपळवंडीच्या ग्रामसभेत चांगलाच गदारोळ झाला. या गदारोळातच गावाला दोन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मिळाल्याने खरा अध्यक्ष कोण? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला आहे.
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने शनिवारी (दि. १५) ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा ठराव मांडण्यात आला. अध्यक्षपदासाठी सोपान लेंडे आणि पिराजी टाकळकर उत्सुक होते. या सभेत सोपान लेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रघुनाथ लेंडे यांनी जर माझा भाऊ अध्यक्ष झाला तर आपण उद्या दिसणार नाही, अशी भूमिका घेऊन त्यास विरोध केला.
यावर सरपंच महादेव वाघ यांनी तुमच्या दोघांच्या भांडणामुळे आपणच अध्यक्षपद स्वीकारत असल्याचे सांगून ते ग्रामसभेतून उठून गेले. त्यानंतरही सभा संपली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य आनंद रासकर यांनी जाहीर केले व ग्रामसभा पुढे सुरू ठेवून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सोपान लेंडे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर गावामध्ये दोन्हीही तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या समर्थर्कंनी अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले.
ग्रामपंचायत सदस्य आनंद रासकर यांनी सांगितले की, रघुनाथ लेंडे तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती असून ते एवढ्या मोठ्या पदावर असूनही ग्रामसभेत आत्महत्या करण्याची धमकी देऊन गावाला वेठीस धरत आहेत, तसेच महादेव वाघ गावचे प्रथम नागरिक असून ते अप्रत्यक्षरीत्या रघुनाथ लेंडे यांना पाठिंबा देत असल्याने आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करीत आहोत.
वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वनजमिनींमधील अतिक्रमण काढण्यासाठी कोणतेच प्रयत्न न केल्याने वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींची जुनी यादी रद्द करून पुन्हा नवीन यादी तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन जुन्नर तहसीलदारांच्या उपस्थितीत याबाबत निर्णय घेण्यात यावा, या विचाराने सर्वानुमते अन्नसुरक्षा योजनेचा विषय तहकूब करण्यात आला.
या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती, वनसंवर्धन समिती व पर्यावरण समितीची निवड करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक भोर यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
या ग्रामसभेसाठी सर्व खात्यांतील कमर्चारी उपस्थित होते, मात्र आरोग्य विभागाचा एकही अधिकारी व कमर्चारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीचे विभाजन व भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध
वाल्हे : आॅगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त वाल्हेचे ग्रामदैवत श्रीभैरवनाथ मंदिरामध्ये वाल्हे ग्रामपंचायतीची ग्रामसभापार पडली. ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचे विभाजन, केंद्राचा भुमिअधिग्रहण कायद्याला विरोध, दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर २५ पैसे आणेवारी लावुन रोजगार हमीचे बजेट तयार करणे आदि विषयांवर जोरदार चर्चेने ग्रामसभा गाजली. वाल्हे परिसरामधील कमी पर्जन्यमानामुळे पडणारा दुष्काळामुळे गावातील पिकपाण्याची आकारणी २५ पैसे एवढी करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात याव्या आणि शेतकऱ्यांच्य हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेतुन विविध कामे सुरू करावीत व त्यासंबंधीचे बजेट तयार करण्यात यावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांकडुन करण्यात आलेली आहे.आजच्या या ग्रामसभेमध्ये केंद्रशासनाच्या शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या भुमिअधिग्रहण कायद्याला देखील जोरदार विरोध करुन तसा ठरावही करण्यात आला.