दमदार पावसामुळे भूजलपातळी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 02:29 IST2019-11-20T02:29:35+5:302019-11-20T02:29:38+5:30
पाच वर्षांतील उच्चांक, टंचाईग्रस्त गावांची संख्या घटली

दमदार पावसामुळे भूजलपातळी वाढली!
- विशाल शिर्के
पुणे : ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिलेल्या दमदार पावसामुळे राज्यातील भूजलाची पातळी पाच वर्षांतील सर्वोत्तम स्थितीला पोहोचली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणातून हे तथ्य समोर आले आहे.
भूजल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी आॅक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे या महिन्यात पाणीटंचाईची पाहणी केली जाते. राज्यातील पाच नदी खोऱ्यातील १ हजार ४३१ पाणलोट क्षेत्राची पाहणी करुन अहवाल केला जातो. यंदा आॅक्टोबरअखेर ३५५ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यात सरासरी अथवा त्याहून अधिक पाऊस झाला. १०३ तालुक्यांपैकी ८७ तालुक्यांमधे २० टक्क्यांपर्यंत, १४ तालुक्यांमधे २० ते ३० आणि २ तालुक्यांमधे ३० ते ५० टक्के तूट आढळली आहे. ५० टक्क्यांहून अधिक तूट असलेला यंदा एकही तालुका नाही.
भूजल आकडेवारीत येणार अचूकता
या पूर्वी भूजल पातळीचा अंदाज ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे केला जात होता. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत ३२,७६९ गावांमधे निरीक्षण विहिरींचे जाळे वाढविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ४३ हजार खेड्यातील भूजलाचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होईल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.