दौंड (राजेगाव): पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी पावसाने हाहाः कार माजवला. या मुसळधार पावसाने नदी, ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी, जिल्हा प्रशासनाकडून नदी, ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार तरुण वाहून गेल्याची घटना दौंड तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी घडली. या वाहून गेलेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्यापही सुरु आहे. दुचाकीवरुन जात असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेगाव (ता.दौंड.) परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे खानवटे (ता.दौंड) येथील दुचाकीवरून जाणारे चार नागरिक वाहुन गेले. त्यातील तीन व्यक्तींचे मृतदेह सापडले असून मृतांमध्ये पती पत्नींचा समावेश आहे. दुपारपर्यंत एकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.