बिनखर्चात फुलली सेंद्रिय आंब्याची बाग
By Admin | Updated: July 2, 2014 02:39 IST2014-07-02T02:39:21+5:302014-07-02T02:39:21+5:30
आंबा पिकवण्यासाठी रासायनिक द्रव्ये वापरली जात असल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्यांची निर्यात बंद झाली.

बिनखर्चात फुलली सेंद्रिय आंब्याची बाग
घोडेगाव : आंबा पिकवण्यासाठी रासायनिक द्रव्ये वापरली जात असल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्यांची निर्यात बंद झाली. मात्र, घोडेगावजवळ नितीन काळे या शेतकऱ्याने पूर्ण सेंद्रिय आंब्यांची बाग केली असून, या बागेतील सेंद्रिय आंब्याला मुंबईमध्ये ११०० ते १२०० रुपये डझन भाव मिळत आहे.
सन २००४ मध्ये ८ एकर क्षेत्रात सुमारे ३०० आंब्याची व २०० सीताफळाची झाडे लावली. त्यांची जमीन पडीक व पूर्ण मुरमाड, खडकाळ स्वरूपाची होती. यामध्ये २५० हापूस आंब्यांची झाडे आहेत, तर मानखुर्द, आम्रपाली, पेढा, पायरी अशा ५० रावळ जाती आहेत. ही बाग पूर्ण सेंद्रिय करण्याचे ध्येय नितीन काळे व त्यांचे बंधू अभिमन्यू काळे यांनी ठेवले होते. त्याप्रमाणे त्यांनी झाडांना सुकी मासळी, शेणखत, निंबोळी पेंट, अख्खी निंबोळी वेळोवेळी टाकली. तसेच दशोपर्णीची फवारणी केली. दशोपर्णीचे द्रव्य गायीचे मूत्र, शेण व विविध झाडांची पाने टाकून तयार केले जाते. मागील पाच वर्षांपासून आंब्याचे उत्पन्न सुरू झाले आहे. कैरी बाठाला आल्यानंतर पाणी देणे बंद करून टाकतात व फळांना उन्हामुळे डाग पडू नये म्हणून संरक्षणासाठी कागदी पिवशी बसवतात. आंबा तोडण्यासाठी तयार झाल्यानंतर व्यवस्थित देठासह तोडणी केली जाते. तोडलेली फळे पेंढ्यात पिकवली जातात. पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारे रासायनिक औषधे वापरत नाहीत. पिकलेले आंबे बॉक्समध्ये भरून मुंबईला हायपर सिटी व गोदरेज मॉलमध्ये पाठवले जातात.