आठ दिवसांत जागा निश्चित
By Admin | Updated: September 13, 2014 05:27 IST2014-09-13T05:27:13+5:302014-09-13T05:27:13+5:30
माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही

आठ दिवसांत जागा निश्चित
घोडेगाव : माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही. अडिवरेची जागा सोडून इतर ठिकाणी जागा पाहण्याचे काम सुरू असून, पुढील आठ दिवसांत जागा निश्चित केली जाईल व लगेचच कायमस्वरूपी निवाऱ्याचे काम सुरू होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घोडेगाव येथे सांगितले.
घोडेगाव येथील हुतात्मा बाबू गेनू पंचायत समिती सभागृहात माळीण दुर्घटनाग्रस्त क्षेत्रातील बाधित कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, समाज कल्याण सभापती सुभाष मोरमारे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, शाश्वत संस्थेचे आनंद कपूर, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अधिकारी, तसेच मर्चडीस बेंझ, टाटा मोटर्स, मोरडे फूड प्रोडक्टस, जेसीबी, गोवर्धन उद्योग समूह, थरमॅक्स, बजाज आॅटो, भीमाशंकर कारखाना, अशा विविध कंपन्यांचे अधिकारी, माळीण ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकारने आम्हाला एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून, लोकांनीही या कामात सहभागी होऊन आपल्यासाठी आदर्श नागरी सोईसुविधा तयार करून घ्याव्यात तसेच पैशाचे त्यांनी योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
(वार्ताहर)