दुष्काळात ‘रोहयो’चा आसरा
By Admin | Updated: March 20, 2016 04:42 IST2016-03-20T04:42:06+5:302016-03-20T04:42:06+5:30
राज्यासह पुणे जिल्ह्यातदेखील दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, यंदा प्रथमच तब्बल ४ लाख ८९ हजार ग्रामस्थांनी रोजगार हमीचे काम मिळण्यासाठी प्रशासनाकडे

दुष्काळात ‘रोहयो’चा आसरा
शेटफळगढे : राज्यासह पुणे जिल्ह्यातदेखील दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, यंदा प्रथमच तब्बल ४ लाख ८९ हजार ग्रामस्थांनी रोजगार हमीचे काम मिळण्यासाठी प्रशासनाकडे नावनोंदणी केली आहे. त्यामुळे भविष्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्यास नागरिकांना रोजगार हमी योजनेचा आसरा मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आजपर्यंत २ लाख ११ हजार ६८१ कुटुंबांतील ४ लाख ८९ हजार २४० मजुरांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कामावर केवळ २०८७ मजूर कामावर आहेत. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ४० कुटुंबांतील ७८ हजार ६७९ मजुरांची नोंद करण्यात आली आहे. तर, सर्वांत कमी नोंद हवेली तालुक्यात झाली आहे.
या तालुक्यातील २ हजार १०१ कुटुंबांतील ४ हजार ४४ मजुरांची संख्या आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये कंसात कुटुंबसंख्या, तर कंसाबाहेर मजुरांची संख्या : आंबेगाव (१४७३१) ३६९५२, बारामती (२५७३१) ५७५४१, भोर (१३४३५) ३०४९९, दौंड (१७४९७) ३९९७१, जुन्नर (२९३७४) ७०६५४, खेड (१७९६०) ४०९११, मावळ (६८६७)१४९०९, मुळशी (३४७७) ४६९८, पुरंधर (१६०७९) ३९६६९, शिरूर (२२३७५) ५५३९२, वेल्हा (८०१४) १५३२१ अशी नोंद झाली आहे . वर्षभरातील कामे ४ हजार ५५५ चालू आहेत. त्यामध्येसुद्धा इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ७०० कामे, तर हवेलीमध्ये केवळ ५० कामे आहेत. जिल्ह्यात एकूण ९ हजार ७५४ कुटुंबांतील मजुरांना २ लाख ७७ हजार ८६७ दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. या योजनेतून रस्ते, वृक्षलागवड इत्यादी कामांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या कामांची संख्या २०८ आहेत. नोंदणीची संख्या अधिक आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात केवळ २ हजार ८७ मजूर काम करीत आहेत. तर, इंदापूर तालुक्याची आघाडी कायम आहे. त्या ५४ कामे, ६२० मजूर इंदापूर तालुक्यातील आहेत. त्या पाठोपाठ शिरूर ५३ (५४४ मजूर), जुन्नर २३ (१७६ मजूर), बारामती १२ (१४१ मजूर), वेल्हा १७ (९० मजूर), पुरदंर १४ (९७ मजूर), आंबेगाव ११ (१४२ मजूर) आणि भोर ११ (११५ मजूर), खेड ४ (५३ मजूर), हवेली ३ (६ मजूर) आणि मुळशी ३ (२६ मजूर), तर दौंड २ (२८ मजूर) आणि मावळ १ (९) अशी एकूण २०८ कामे सुरू आहेत. (वार्ताहर)
सार्वजनिक कामे
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेत सार्वजनिक, वैयक्तिक कामांचा समावेश आहे. सार्वजनिक कामांमध्ये पाणंद रस्ते, वृक्षलागवड, फळबाग लागवडीचा समावेश आहे.
वैयक्तिक कामे
वैयक्तिक कामांमध्ये स्वच्छतागृह, सिंचन विहीर, वृक्षसंगोपन, फळबागलागवड, कुक्कुटपालन, शोषखड्डा, गाईगोठा, इंदिराआवास घर आदींचा समावेश आहे. त्यापैकी तुलनेने सार्वजनिक कामांपेक्षा वैयक्तिक कामांकडे अधिक कल असल्याचे चित्र आहे.