पुणे : देशभरातील न्यायालयांसाठी रोल मॉडेल ठरलेले पुण्यातील कौटुंबिक न्यायालय ‘ई-फायलिंग’मध्ये अग्रेसर ठरले असून, न्यायालयीन कामकाज १०० टक्के पेपरलेस करण्यात कौटुंबिक न्यायालयाला यश मिळाले आहे. पेपरलेस कामकाजामुळे आता फाइल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून, ई-फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज ई-फायलिंगद्वारे करण्याची अधिसूचना काढली. त्यानुसार जिल्ह्यामधील न्यायालयांनी ‘ई-फायलिंग’ प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली असली, तरी अजूनही जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ई फायलिंग’ प्रणालीचा १०० टक्के वापर होताना दिसत नाही.
ई-फायलिंग प्रक्रियेत विविध प्रकारच्या समस्या वकिलांना उद्भवत असून, न्यायालयीन कामकाजाला विलंब होत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याला पुण्याचे कौटुंबिक न्यायालय अपवाद ठरले आहे. कौटुंबिक न्यायालयाचे बहुतांश कामकाज पेपरलेस होत असून, केवळ ई-फायलिंगद्वारेच दावे दाखल होत असल्याचे वकिलांनी सांगितले.
ई-फायलिंगमुळे पक्षकारांना मेसेजद्वारे जाते सुनावणीच्या तारखेचे नोटिफिकेशन
एखादी केस ई-फायलिंग केल्यावर दोन्ही पक्षकारांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. ई-फायलिंगमध्ये तुमच्या विरुद्ध केस दाखल झाली आहे, हे नोटीफाय होते. तुमच्या या क्रमांकाची केस रजिस्टर झाली असून, तारीख कोणती पडली आहे, याचे पक्षकारांना मेसेज पाठवले जातात. वकिलांनादेखील मेल केला जातो.
ई-फायलिंग म्हणजे काय?
ई-फायलिंग म्हणजे न्यायालयात दाखल करायच्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन प्रणाली वापरणे. या प्रणालीमुळे वकिलांना आणि पक्षकारांना कोणत्याही ठिकाणाहून न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहता, ऑनलाइन अर्ज, शपथपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे दाखल करता येतात.
ई-फायलिंगचे फायदे
१) न्यायालयाच्या चकरा वाचल्यामुळे प्रवासाच्या आणि इतर खर्चात बचत होते.
२) ऑनलाइन प्रणालीमुळे कागदपत्रे सुरक्षित राहतात.
३) केससंबंधी माहिती ऑनलाइन उपलब्ध असल्याने कामकाज अधिक पारदर्शक होते.
पूर्वी कौटुंबिक न्यायालयात कागदपत्रे फायलिंगसाठी दिली जायची. तिथे माणूस उपलब्ध असेल किंवा नसेल तरी पंधरा दिवसांनी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन व्हायचे. त्यानंतर फायलिंग क्रमांक पडून केस कोर्टात जात असे. यात कागदपत्रे गहाळ होणे किंवा आम्हाला कागदपत्रेच मिळाली नाही. त्यामुळे प्रक्रिया लांबली जायची. पण ‘ ई-फायलिंग’मुळे हा सगळा प्रकार थांबला आहे. आता कागदपत्रे पाहिली नाहीत किंवा कागदपत्रे मिळाली नाहीत, हे कुणीच नाकारू शकत नाही. वकीलपत्र असलेल्या प्रत्येक वकिलाला ई-फायलिंगचा ॲक्सेस मिळतो. त्यामुळे वकिलांना केससाठी तत्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देता येतात. एखाद्या वकिलाची फाईल हरवली, तरी ई-फायलिंगमध्ये कागदपत्रे सेव्ह असल्याने वकिलांना फाईल घेऊन फिरायची गरज भासत नाही. ई-फायलिंगचे कामकाज वकिलांसाठी फायदेशीर ठरत आहे. - ॲड. प्रसाद निकम कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंगद्वारे केस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वकिलांचा वेळ वाचला आहे. कोणत्याही ठिकाणावरून आणि कोणत्याही वेळेस वकील ई-फायलिंगच्या माध्यमातून केस दाखल करणे वकिलांसाठी फायदेशीर ठरत आहे. - ॲड. सुरेश एस. बेराड, मुंबई उच्च न्यायालय