गवसलेल्या सुरांनी खुले झाले मुक्तीचे दार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:05 AM2019-03-06T01:05:09+5:302019-03-06T01:05:11+5:30

माझा कोणताच दोष नव्हता; पण मला न्यायालयात माझे निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही आणि एका चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

False tunes are open ... | गवसलेल्या सुरांनी खुले झाले मुक्तीचे दार...

गवसलेल्या सुरांनी खुले झाले मुक्तीचे दार...

googlenewsNext

- नम्रता फडणीस 

पुणे : माझा कोणताच दोष नव्हता; पण मला न्यायालयात माझे निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही आणि एका चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. चार वर्षांचा तुरुंगवास घडला... हा माझ्यासाठी अनपेक्षित असा धक्का होता... हे बोल आहेत, नितीन आरोळे यांचे. हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते... येरवडा कारागृहातील अनुभव, सुधारगृहामुळे आयुष्याला मिळालेली दिशा, याविषयी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. परंतु, या कारागृहात त्यांना ‘सूर’ गवसला आणि ते गायक बनले.
आयुष्यात घडलेल्या एका चुकीची खूप मोठी किंमत मोजावी लागते आणि त्या चुकीमुळे कारागृहाच्या निर्जीव भिंतींच्या आत त्याचे जीवन बंदिस्त होऊन जाते... मग ज्याच्यामुळे हे घडले त्या व्यक्तीचा ‘बदला’ घेण्याची भावना मनात घर करू लागते... कदाचित एखाद्या चित्रपटाची ही कथा वाटू शकेल! त्या ‘बंदिवाना’च्या आयुष्यात असेच काहीसे घडले... मात्र त्याच्या कथेचा शेवट काहीसा ‘हटके’ झाला. कारागृहाच्या सुधारशाळेने त्याला ‘गायक’ होण्याचे स्वप्न दिले अन् शिक्षा भोगून आलेल्या या बंदिवानाच्या जीवनाला नवा ‘सूर’ गवसला... कारागृहातील सदाचारी वागणुकीमुळे सर्वांचे ‘गुरुजी’ बनलेल्या नितीन आरोळे यांची ही गाथा समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.
ते म्हणाले, ‘‘लहानपणापासून मला कलेची आवड होती. शाळेत असतानाच ‘किलबिल’ नाट्यसंस्थेची स्थापना केली. महाविद्यालयात असताना आॅर्केस्ट्रात गायची संधी मिळाली. मात्र २0१५ मध्ये अशी एक घटना घडली आणि नशिबाचे फेरे बदलले. माझा कलेच्या क्षेत्रातील उंचावत चाललेला आलेख काहींना न बघवल्यामुळे गैरसमज आणि राजकारणातून मला अडकविण्यात आले. त्यातून मला चार वर्षांची शिक्षा झाली. माझी कोणतीही चूक नसताना मला शिक्षा मिळाली. कारागृहातल्या वातावरणात गांधीजींची पुस्तके वाचनात आली आणि स्वत:मध्ये बदल घडत गेला. तिथे वेगवेगळी कामे करीत असताना गाणी म्हणायचो. हळूहळू इतर सहकारी आणि कॉन्स्टेबल यांना माझा आवाज आवडायला लागला. दरम्यान, कारागृहात ‘प्रेरणापथ’ प्रकल्पांतर्गत एक सांगीतिक कार्यक्रम होता.
सर्वांनी मला गायचा आग्रह केला आणि पहिले गाणे तिथे गायले. त्यानंतर कारागृहात कार्यक्रम करण्यासाठी आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक झाकीर हुसेन, शंकर महादेवन, शिवमणी अशा दिग्गजांनी माझ्या गाण्याचे कौतुक केले. कारागृह प्रशासनाने माझ्या गाण्याला खूप प्रोत्साहन दिले. अनेक संधी मिळत गेल्या आणि आयुष्याला एक नवा सूर गवसला. माझ्या कारागृहातील चांगल्या वागणुकीमुळे १७ महिन्यांची शिक्षा माफ झाली आणि आॅगस्ट २0१८ ला माझी मुक्तता झाली.
>खरंतर ‘चुका’ या प्रत्येकाच्या हातून होतात; पण चुकांना माफ करून पुन्हा नव्याने उभे राहण्याची ताकद कारागृह प्रशासन कैद्यांमध्ये निर्माण करीत आहेत. हीच खूप मोठी जमेची बाजू आहे. माझ्यावर कारागृहात असताना गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. सकारात्मक विचारसरणी घडत गेली. एका शिक्षेतून आयुष्यात खूप काही शिकलो. सूडभावनेतून हाती काहीच लागत नाही. त्याचे वाईट झाले की आपलेपण होणारच आहे. आयुष्यात जे घडले ते चांगलेच घडले, असे मी मानतो. प्रत्येकाने मनातून तिरस्कार, सूडभावना काढून टाकायला हवी. एका चुकीची शिक्षा आपल्यालाच नाही तर ‘कुटुंबा’लाही भोगावी लागते. त्यांचे आयुष्यही बंदिस्त होऊन जाते. प्रत्येक मनुष्याने कोणतीही चुकीची किंवा वाईट कृती करताना सर्वप्रथम कुटुंबाचा विचार केला पाहिजे, असा मौलिक संदेशही नितीन आरोळे यांनी दिला.

Web Title: False tunes are open ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.