कोरोनातही वारकऱ्यांनी जपली पायी वारीची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:27+5:302021-07-07T04:12:27+5:30
केडगाव : साधुसंत मायबाप तिही केले कृपादान । पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥ या उक्तीप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग ...

कोरोनातही वारकऱ्यांनी जपली पायी वारीची परंपरा
केडगाव :
साधुसंत मायबाप तिही केले कृपादान ।
पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥
या उक्तीप्रमाणे,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाने आषाढी वारी रद्द केली असली, तरी चौघे जण वारकरी देहू ते पंढरपूर पायीवारीसाठी निघाले आहेत.
मूळचे तुळजापूर येथील असणारे हे वारकरी दर वर्षी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर पायी प्रवास करत आहेत. यावर्षी पंढरपूरला शक्य असेल इतक्या लांब त्यांचा जाण्याचा मानस आहे. पालखी सोहळ्यामध्ये ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम असतो, त्या ठिकाणी वारकरी मुक्काम करतात व दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पायी अंतर कापत आहेत.रस्त्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांना अन्नदान, पाणी, नाष्ता, अंघोळ यांच्या सुविधा मिळत आहेत. यामध्ये शिवाजी साखरे व मीरा साखरे हे दांपत्य विलास देवकर, तसेच दगडू रोकडे या चौघांचा समावेश आहे. यामध्ये मीरा साखरे यांच्या डोक्यावर तुळशी, दगडू रोकडे यांच्या हाताममध्ये वीणा, तर दोघांच्या हातामध्ये भगवी पताका आहे. ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषामध्ये हे चौघे जण पंढरपूर मार्ग होत आहेत. सर्व वारकरी मूळचे तुळजापूर येथील असून येथे दाखल झाले व गुरुवार, दिनांक १ पासून देहू-पंढरपूर मार्गस्थ झाले आहेत. यासंदर्भात मीरा साखरे म्हणाल्या की, गेल्या २३ वर्षांपासून आमच्या दाम्पत्याची आषाढी वारीची परंपरा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी रद्द होऊनही पंढरीला जाण्याचा विचार आहे. आषाढी एकादशीला कळसाचे दर्शन घेण्याचा विचाराने विठुरायाच्या मनामध्ये असेल तर नक्कीच कळसाचे दर्शन मिळेल.
सहजपूर, तालुका दौंड, जिल्हा पुणे-सोलापूर महामार्गावर पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले वारकरी.