अंडी, मांसापेक्षाही काळ्या मनुका, खजूर, तूप, मध कोरोना काळात बलकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 11:38 IST2021-05-21T04:09:55+5:302021-05-21T11:38:38+5:30
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद

अंडी, मांसापेक्षाही काळ्या मनुका, खजूर, तूप, मध कोरोना काळात बलकारक
पुणे : कोविड संकटाच्या निवारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही प्रमुख वैद्यकीय संस्थाप्रमुख व संशोधकांशी नुकताच संवाद साधला. त्यात पुण्यातील वैद्य प्रसाद पांडकर यांचा समावेश होता. भारती विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असणारे वैद्य प्रसाद पांडकर कोविड काळात सर्व अवस्थेतील रुग्णांची आयुर्वेद चिकित्सा व त्याचे संशोधन या दोन्ही पातळ्यांवर कार्यरत आहेत.
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समवेत पंतप्रधानांशी संवाद साधता आल्याबद्दल वैद्य पांडकर यांनी आनंद व्यक्त केला. आज ‘आहार हेच सर्वात मोठे औषध’ हेच आयुर्वेदीय तत्त्व वापरले तर खूप फायदा होऊ शकेल व कोविड रुग्णाला ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरवर जाण्यापासून रोखणे शक्य होईल, असे आग्रही प्रतिपादन वैद्य पांडकरांनी केंद्र सरकारकडे केले.
वैद्य पांडकर म्हणाले, “आयुर्वेदात रुग्ण व अवस्थेनुसार चिकित्सा बदलते. कोविडच्या या संकट काळात एक डॉक्टर सर्वदूर पोहोचू शकत नाही; पण औषध पोहोचू शकते. आयुर्वेदीय तत्त्वे वापरून असे औषध बनवणे अवघड होते. गुरुवर्य वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. कोविड रुग्णांना पहिल्या सहा-सात दिवसांत (व्हायरस वर्धनाचा काळ) उकळून निम्मे केलेले पाणी (पाण्याचा काढा), सुंठ-तूप-गूळ गोळी व आयुर्वेदात विषाणूजन्य तापांसाठी सांगितलेले सप्त मुष्टिक युष (हुलगे, वाळलेला मुळा, सुंठ, धने, बार्ली घातलेले मुगाचे कढण) हे आहारातून देणे शक्य आहे.”
कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंडी, मांस वगैरे प्रथिनयुक्त आहार दिला जातो. पण प्रथिनांच्या पलीकडे जात विशिष्ट धातूंसाठी विशिष्ट आहार-औषध हा आयुर्वेदाचा विचार आहे. या काळात काळ्या मनुका, खजूर, वेलची, दालचिनी, तूप, मध असे एकत्र करून खाल्ल्यास फुफ्फुसे, रक्त व प्रतिकारशक्तीसाठी बलकारक ठरते व रक्तातील प्राणवायू वाढण्यास मदत होते. पित्त वा उष्ण प्रकृतीचे रुग्ण सोडून बाकी रुग्णांना लसूण पाकळ्या उकळलेले दूध फुप्फुसासाठी अत्यंत लाभदायक ठरते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या अशा आहारातल्या औषधांचा वापर करण्याविषयीचा आग्रह केंद्रीय आयुष विभागाकडे धरला असल्याचे पांडकर म्हणाले.