अबाधित बंधुतेसाठी शिक्षण हेच अवजार
By Admin | Updated: January 18, 2015 01:30 IST2015-01-18T01:30:03+5:302015-01-18T01:30:03+5:30
राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे.

अबाधित बंधुतेसाठी शिक्षण हेच अवजार
पुणे : राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे. सरकारने समतेवर आधारलेल्या राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा नियोजनपूर्वक वापर केला पाहिजे, असे डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सांगितले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने १६वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, भाई वैद्य, अॅड. प्रमोद गुजर, प्रकाश रोकडे, डॉ. विकास आबनावे, शंकर आथरे, डॉ. भीम गायकवाड, महेंद्र भारती उपस्थित होते. या वेळी अशोक विद्यालयापासून संमेलनस्थळापर्यंत राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली.
विविध वर्तमानपत्रांप्रमाणे बंधुता ही या संमेलनाची भाषा आहे. ही भेदाची नाही तर शांतीची, फाडण्याची नाही तर जोडण्याची भाषा आहे, असे रोकडे म्हणाले. आपण जोवर एकमेकांशी मराठीत बोलत आहोत, तोवर मराठी भाषा संपणार नाही; परंतु बंधुतेच्या भाषेची चिंता आहे. आज बंधुतेवर साहित्य लिहिण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
बंधुतेशिवाय काही जवळचे नसते. त्या बंधुतेच्या प्रेरणेतूनच सहकार्य मिळते, असे मत स्वागताध्यक्ष गुजर यांनी व्यक्त केले. अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘खरा तो एकचि धर्म’ गीत सादर केले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)
४कायदा-सुव्यवस्था ही केवळ सार्वजनिक शांततेच रक्षण करणारी फौज नव्हे, तर जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या मानवाधिकाराची राखण करणारी संवेदनक्षम आणि पारदर्शी यंत्रणा बनली पाहिजे. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा आणि विहारांमधून सामाजिक समतेच्या प्रार्थना झाल्या पाहिजेत. ही राष्ट्रउभारणीची खरी पायवाट आहे, असे लिंबाळे यांनी सांगितले.