बंडखोरीच्या भीतीने याद्यांना विलंब
By Admin | Updated: February 2, 2017 04:07 IST2017-02-02T04:07:44+5:302017-02-02T04:07:44+5:30
उमेदवार यादी जाहीर केल्यास असंतुष्ट उमेदवाराला प्रतिस्पर्धी पक्ष जाळ्यात ओढेल, या भीतीने अगदी ऐन वेळी नावे जाहीर करण्याचा निर्णय शिवसेना, भाजपा व काँग्रेस

बंडखोरीच्या भीतीने याद्यांना विलंब
पुणे: उमेदवार यादी जाहीर केल्यास असंतुष्ट उमेदवाराला प्रतिस्पर्धी पक्ष जाळ्यात ओढेल, या भीतीने अगदी ऐन वेळी नावे जाहीर करण्याचा निर्णय शिवसेना, भाजपा व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चार प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला असल्याची चर्चा आहे. त्यांच्या असंतुष्ट उमेदवारांकडे डोळे लावून बसलेल्या मनसेसह अन्य राजकीय पक्षांनीही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे टाळले आहे. ४१ प्रभागांतील १६२ जागांसाठी (त्यांतील ८१ महिला) या राजकीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करायचे आहेत.
शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यानंतर त्यांच्याकडून लगेच उमेदवारांची प्रभागनिहाय नावे, किमान पहिली यादी तरी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, या दोन्ही पक्षांनी अद्याप एकही यादी जाहीर केलेली नाही. भाजपाकडे इच्छुकांची संख्या ८७० इतकी आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यताही जास्त आहे. तसे होऊ नये, यासाठी यादी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या ६८७ आहे. तरीही त्यांना भाजपाच्या यादीत रस आहे. एखाद्या प्रभागात शिवसेनेचा सक्षम उमेदवार नसेल, तर तिथे भाजपाच्या असंतुष्ट उमेदवाराला पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा विचार असल्याचे दिसते आहे. त्यांचीही यादी अद्याप जाहीर झालेली नाही.
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची स्थितीही तशीच आहे. दोन आठवड्यांची त्यांची चर्चा फुकाचीच ठरली. त्यांची आघाडी तुटली आहे. दोन्ही पक्षांनी ४१ प्रभागांतील १६२ जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या ५७५ आहे, तर काँग्रेसकडे ५३५ जणांनी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळाली नाही, तर या दोन्ही पक्षांतूनही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उमेदवारांची नावे ऐन वेळी जाहीर करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असल्याची माहिती मिळाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही रिंगणात आहे. त्यांच्या इच्छुकांची संख्याही ५२५ आहे. त्यांचे सर्व लक्ष चार प्रमुख राजकीय पक्षांच्या यादीकडे आहे. त्यामुळे त्यांनीही उमेदवार
जाहीर करणे टाळले आहे.
त्याशिवाय रिपाई (आठवले गट)
आहे. त्यांनी भाजपाकडे २८ जागा मागितल्या असून त्याचा निर्णय काय होतो, याची त्यांनी प्रतीक्षा आहे. त्यांच्याकडेही ६५ जण इच्छुक आहेत. बसपाकडेही ६० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
बुधवारअखेरपर्यंत केवळ ५६ अर्ज
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी बुधवारपर्यंत केवळ १६२ जागांसाठी केवळ ५६ अर्ज निवडणुक कार्यालयांकडे दाखल झाले आहेत. बुधवारी दिवसभरात ३७ जणांनी अर्ज जमा केले असून एकूण संख्या ५६ झाली आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
प्रमुख राजकीय पक्षांकडून बुधवारी देखील उमेदवारी याद्या जाहीर न झाल्याने इच्छूक उमेदवारांना अर्ज भरता येऊ शकलेले नाहीत. आॅनलाइन स्वरूपात जमा केलेल्या अर्जाच्या संख्येने १५०० चा टप्पा ओलांडला आहे. मात्र आवश्यक त्या कागदपत्रांसह निवडणुक अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा केल्याशिवाय तो अधिकृत मानला जाणार नाही.
महापालिका निवडणुकांसाठी शुक्रवारपासून (दि.२७ जानेवारी) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची ३ फेब्रुवारी ही शेवटची मुदत आहे. मंगळवारी आॅनलाइन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन झाल्याच्या अडचणी आल्या होत्या, मात्र बुधवारी आॅनलाइन यंत्रणा सुरळित सुरू राहिली.
बहुसंख्य उमेदवारांचे अर्ज अद्यापही जमा झालेले नाहीत. त्यामुळे गुरूवार व शुक्रवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यांची उमेदवारी यादी अजून जाहीर झालेली नाही.
राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट उमेदवारांना फोन करून ए व बी फॉर्म दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता राज्य निवडणुक आयोगाच्या सुधारीत आदेशानुसार राजकीय पक्षांना थेट आयुक्तांकडे ए व बी फॉर्म जमा करता येऊ
शकणार आहे. त्यामुळे
उमेदवारांनी केवळ फॉर्म भरला तरी चालणार आहे. राजकीय पक्षाकडून सर्व उमेदवारांचे ए व बी फॉर्म थेट आयुक्तांकडे जमा करता येऊ
शकणार आहेत.