बारामतीत चौथ्या वर्षीही दुष्काळाच्या झळा
By Admin | Updated: August 28, 2016 05:20 IST2016-08-28T05:20:50+5:302016-08-28T05:20:50+5:30
कृषी विभागाने बारामती तालुक्यात खरीप हंगाम वाया गेल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तत्पूर्वीच बारामती तालुक्याच्या जिरायती भागात सलग चौथ्या वर्षीच्या दुष्काळाची

बारामतीत चौथ्या वर्षीही दुष्काळाच्या झळा
बारामती : कृषी विभागाने बारामती तालुक्यात खरीप हंगाम वाया गेल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तत्पूर्वीच बारामती तालुक्याच्या जिरायती भागात सलग चौथ्या वर्षीच्या दुष्काळाची दाहकता जाणवणार, असे चित्र आहे. पाणी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेजारील इंदापूर तालुक्यात महामार्ग रोखणाऱ्या बारामतीच्या लोकप्रतिनिधींना बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी व तेथील पाणीप्रश्न दिसला नाही का? असा संतप्त सवाल आता बारामतीच्या जिरायती भागातून विचारला जाऊ लागला आहे.
बारामती तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ११ हजार ९०५ हेक्टरवर पेरण्या झालेल्या होत्या. यामध्ये ७ ते ८ हजार हेक्टरवर बाजरीच्या पेरण्या झाल्या. त्याखालोखाल चारा पिकांच्या पेरण्या होत्या. मात्र, सुरुवातीला झालेला रिमझिम पाऊस व त्यानंतर तब्बल तीन महिने पावसाने दिलेली ओढ यामुळे बारामतीचा जिरायती भाग सलग चौथ्या वर्षी दुष्काळाने होरपळून गेला आहे. मागील चार वर्षांपासून येथील शेतकऱ्याच्या हाताला एकही पीक लागले नाही. हक्काचा हंगामच वाया गेल्याने या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित धुळीस मिळाले आहे. मुलांची शिक्षणे, रोजच्या उपजीविकेचा खर्च, कोसळलेले दूधदर, चाऱ्याच्या गगनाला भिडलेल्या किमती, मुला-मुलींचे लग्न या साऱ्या खर्चाच्या चिंतेने येथील सर्वसमान्य शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यामुळे आता जगायचे कसे, हा एकमेव प्रश्न या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.
शासनाने बारामती तालुक्यातील ६४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केली होती. या गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षाही कमी आहे. येथील शेतकऱ्यांनी या आधारावरच वारंवार दुष्काळी मदतीची मागणी शासनाकडे केली होती. त्यासाठी आंदोलनेदेखील केली. मात्र, ढिम्म शासन यंत्रणने शेतकऱ्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार देखील केला नाही. तसेच दुष्काळी मदत खेचून आणण्यात येथील नेतृत्वदेखील कमी पडल्याचे चित्र आहे. जिरायती भागात बारमाही शेती व्यवसाय पाणीसमस्येमुळे करता येत नाही. त्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरची चुल दुग्धव्यवसायावरच पेटते. मात्र दुष्काळ असूनही या भागात छावण्या सुरू करण्यात आल्या नाहीत. परिणामी, शेतकरी चारा विकत घेऊ लागले.
दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच टँकरच्या प्रश्नावर पळसदेव येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर महामार्ग रोखला होता. त्यानंतर येथील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार सुळे यांनी बारामती सारखा इंदापूर तालुक्याचा विकास करून दाखवू, याबाबत जिरायती भागातील शेतकऱ्यांना बोलते केले असता, तार्इंनी आमच्याकडं पण बघावं, घरातला पैैसा अडका संपत आलाय. जनावराला खायला गवताची काडीसुद्धा शिल्लक नाही. दूधधंद्याच्या जोरावर खिशात दमडी तरी येईल, पण चारा-पाणी परवडत नसल्यानं जनावर विकावी लागली.