पुणे : मराठा आरक्षण प्रश्नावर सूचना करणारे अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांनी दहा-दहा वर्षे सरकारमध्ये काढले आहेत. उगाचच आम्हाला त्या खोलात जायला लावू नका. ते सर्व आदरणीय, पूजनीय, वंदनीय मान्यवर आहेत. मला त्याबद्दल आणखी खोलात जायचे नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये पक्षाच्या विविध विभागांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबतशरद पवार यांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत अजित पवार म्हणाले, शरद पवार हे तामिळनाडूमधील आरक्षणासंदर्भात बोलत असले, तरी ते आरक्षण कधी देण्यात आले हे पाहावे. आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधीच तामिळनाडू राज्याने ते आरक्षण लागू केले आहे.
मुंबई येथे मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. त्यांना शिंदे समितीचे सदस्य भेटायला गेले होते, याबाबत विचारले असता ते म्हणाले, अशावेळी प्रयत्न करणे हे काम असते. राज्य सरकार याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, सरकारची भूमिका सकारात्मक आहे. यातून मार्ग निघालाच पाहिजे, हीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे. या समितीचे अध्यक्ष जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांच्या समितीतील सर्व सदस्य बसून चर्चा करतील. चर्चेतून मार्ग निघू शकतो, आजवरचा अनुभव आहे.
परिस्थिती चिघळली, तर त्याला जबाबदार फडणवीस असतील, असे वक्तव्य जरांगे यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, जे कोणी आंदोलन करतात, ती त्यांची भूमिका मांडत असतात. लोकशाहीत संविधानाने त्यांना तो हक्क दिला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करत आहे. हे सगळे सामोपचाराने मिटेल, उपोषण कसे संपेल, हा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचदरम्यान आपल्या दरे गावी गेल्याने फडणवीस एकटे पडल्याचे चित्र आहे. याबाबत विचारले असता, त्यांनी याचा इन्कार केला.