जिल्ह्यात होणार काटाबंद!
By Admin | Updated: December 19, 2014 02:25 IST2014-12-19T02:25:27+5:302014-12-19T02:25:27+5:30
case, या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आता कारखान्यांच्या विरोधात संघर्ष होण्याची शक्यता आहे

जिल्ह्यात होणार काटाबंद!
बारामती : साखर आयुक्तांचे आदेश असताना देखील जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखान्यांनी किमान आधारभूत किमतीपेक्षा (एफआरपी) ३०० ते ४०० रुपयांनी पहिला हप्ता कमी दिला आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आता कारखान्यांच्या विरोधात संघर्ष होण्याची शक्यता आहे. एफआरपी प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जाणार आहे. तसेच प्रसंगी काटाबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
स्वाभिमानीच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्तांना पत्र दिले होते. एफआरपी प्रमाणे कारखान्यांनी दर जाहीर करावेत. अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे साखर आयुक्तांनी त्यानंतर कारखान्यांना आदेश दिले होते.
माजी मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर या कारखान्यांनी देखील एफआरपीप्रमाणे दर दिलेला नाही. तर दुसरीकडे अजित पवार विधीमंडळात ३५०० रुपयांचा दर द्यावा, अशी मागणी करीत आहेत. सुरुवातीला त्यांनीच आपल्याच कारखान्याच्या संचालक मंडळाला एफआरपी प्रमाणे दर जाहीर करण्यास भाग पाडावे, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी देखील एफआरपीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे येत्या २२ डिसेंबर रोजी माळेगाव, सोमेश्वर, छत्रपतीसह जिल्ह्यातील अन्य कारखान्यांवर देखील आंदोलन करण्यात येणार आहे.
सध्या जाहीर केलेल्या
१८०० रुपये दरात शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज देखील फिटणार
नाही. एफआरपीची रक्कम एकरकमी द्यावी, अशीही मागणी ढवाण यांच्यासह स्वाभिमानीचे महेंद्र तावरे, विठ्ठल देवकाते, अॅड. रोहन कोकरे, बाळासाहेब जगताप यांनी केली आहे. स्वाभिमानीच्या या
आंदोलनात शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर आदी सहभागी होणार
आहेत. एफआरपी प्रमाणे दर
देऊन अजित पवार यांनी त्यांच्या ताब्यातील कारखान्यांद्वारे कोंडी फोडावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)