पुणे :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभाराविरोधात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिसाळ यांनी पत्रात बाजार समितीच्या गैरप्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत पुन्हा प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.
पर्वती मतदारसंघात असलेल्या गुलटेकडी मार्केट यार्ड बाजार समितीच्या कारभाराबाबत गेल्या काही महिन्यांपासून गंभीर तक्रारी येत आहेत. यापूर्वी तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी संचालक मंडळाच्या चौकशीचे आदेश दिले होते. व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी, अनधिकृत बांधकामे, झोपड्या, स्टॉल, होर्डिंग्ज आणि रस्त्यांवरील बेकायदेशीर विक्रेते यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बाजार समितीच्या परिसरात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अनधिकृत स्टॉलमुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे मिसाळ यांनी बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी करीत पत्रात नमूद केले की, पूर्वी प्रशासकाच्या नियंत्रणाखाली बाजार समितीचे कामकाज सुरळीत चालत होते. मात्र, संचालक मंडळ स्थापन झाल्यापासून परिस्थिती बिघडली. यामुळे बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.