लसींच्या दरातील फरक म्हणजे केद्रांची नफेखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:24+5:302021-04-25T04:09:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना लसीच्या दरांमधील फरक हे केंद्र सरकारमध्ये व्यापारी बसले असून त्यांच्या नफेखोरीचे उदाहरण आहे, ...

लसींच्या दरातील फरक म्हणजे केद्रांची नफेखोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना लसीच्या दरांमधील फरक हे केंद्र सरकारमध्ये व्यापारी बसले असून त्यांच्या नफेखोरीचे उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अनिल देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई म्हणजे मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारने देशवासीयांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन पटोले यांनी शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
पत्रकारांबरोबर बोलताना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले माहिती नाही अशी खिल्ली उडवत पटोले म्हणाले की, मोदींनीच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे जाहीर केले होते. आता ते राज्यांवर जबाबदारी ढकलत आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांंनी नियोजन करून आपल्या देशाला कोरोना मुक्त केले. आपल्या प्रमुखाकडे नियोजन नाही. लसी, ऑक्सिजन, आरोग्य सेवा यापैकी कशाचेही नियोजन त्यांनी केले नाही. राज्य त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, मात्र केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिल्यावर पटोले यांनी त्यांच्याकडून जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. राव व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे काम चांगले आहे, दोघेही अनुभवी आहेत असे त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्र्यांना सांगितले. केंद्र सरकारने दुष्मन देश असलेल्या पाकिस्तानला कोरोना लस फुकटात पुरवली आहे, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला. राज्य सरकारने केंद्राकडे परदेशातून लसी आयात करण्याची परवानगी मागितली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
--राहुल, मनमोहन सिंग यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष--
त्यांच्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी राहुल गांधी, मनमोहनसिंग यांच्या सल्ल्याची टिंगल केली. पण आता त्याप्रमाणेच काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राहुल गांधी, मनमोहनसिंग दिल्लीत विरोधात असूनही केंद्र सरकारला कोरोनासंदर्भात चांगले सल्ले देत आहेत आणि महाराष्ट्रात विरोधी पक्ष मध्यरात्री दमणवरून रेमडेसिविर आणण्यात गुंतले आहेत, अशी टीका पटोले यांनी महाराष्ट्र भाजपवर केली.
--देशमुखांवर कारवाई म्हणजे दिशाभूल--
अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत आहे ती करण्याची ही वेळ नाही. आता कोरोनाविरोधात लढायला हवे. पण तेथील चुका लक्षात येऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला. राज्यांतर्गत प्रवासाला बंदी, कोरोना लसींचे वितरण ही सगळी केंद्र सरकारची जबाबदारी आहे. लसींचे सगळे अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.
फोटो - नाना पटोले
आेळी - विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. सोबत काँग्रेसचे पदाधिकारी.