महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू, जिल्हाधिकाऱ्यांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST2021-02-20T04:29:11+5:302021-02-20T04:29:11+5:30
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. ...

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू, जिल्हाधिकाऱ्यांचा
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने महाविद्यालये पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत उदय सामंत यांने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व कुलगुरूंनी एकूण परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे स्पष्ट केले.
महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप वसतिगृहे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पुण्याबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच सध्या महाविद्यालये सुरू होऊनसुद्धा ऑफलाइन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसत आहे. याबाबत सामंत म्हणाले, राज्यात अजूनही काही वसतिगृहे क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत. तसेच वसतिगृहातील एका खोलीत किती विद्यार्थी राहू शकतात, याबाबत यूजीसीने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने नियमावली तयार करणे आवश्यक आहे.
दरम्यान, पुण्यातील काही महाविद्यालयांनी सध्या केवळ प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले आहे. आठवड्याभरात एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू केले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाविद्यालये सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.