दौंडला नगरसेवकांचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:29+5:302021-07-07T04:12:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दौंड : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्या मनमानी कारभाराच्या निषेर्धात राष्ट्रवादी, शिवसेनेच्या ...

दौंडला नगरसेवकांचा घंटानाद
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्या मनमानी कारभाराच्या निषेर्धात राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेत घंटानाद ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात नागरिक हित मंडळाचे दोन नगरसेवक सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी घंटानाद आणि भजनाचा कार्यक्रम आंदोलकांनी केला.
नगराध्यक्षा शीतल कटारिया, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी नगरपालिकेचे खासगीकरण केले आहे. नगराध्यक्ष कायद्याची पायमल्ली करीत असल्याचा आरोप करीत नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी गटनेते बादशहा शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. शहरातील विकासकामे ही सर्वसाधारण सभा, स्थायी सभाअभावी रखडली आहेत. या दोघांच्या हट्टीपणा तसेच मनमानी कारभारामुळे शहराचा विकास रखडला आहे. या निषेधार्थ हे आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सर्वसाधारण आणि इतर सभा होत नसल्याने शहरातील विकासकामे रखडलेले आहे. तसेच मी स्वतः येथील भ्रष्टाचाराच्या विविध तक्रारी पुराव्यासहित देऊनसुद्धा मुख्याधिकारी कोणतीच कार्यवाही करीत नाहीत, अशा तक्रारी अर्जांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी बादशहा शेख यांनी केली. पक्षाच्या विविध मागण्यांचे निवेदन या वेळी आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष विलास शितोळे, नगरसेवक इंद्रजित जगदाळे, शिवसेनेच्या नगरसेविका हेमलता परदेशी, रिजवाना पानसरे, वसीम शेख, संजय चितारे, मोहन नारंग, गौतम साळवे यांसह युतीचे नगरसेवक, नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड, जिवराज पवार या आंदोलनात सहभागी झाले होते.
कोट
आरोपात तथ्य नाही
आंदोलकांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. त्याचप्रमाणे मी सर्वसाधारण आणि इतर सभा बोलावीत नाही, हा आरोपही चुकीचा आहे. सभा बोलविण्याचा अधिकार मला नसून नगराध्यक्ष यांना असतो. सर्वसाधारण सभा घ्यावी म्हणून मी नगराध्यक्षांकडे मागणी केली आहे. शहर विकासकामाचे निर्णय सभागृह घेते. त्यामुळे मी नगरपालिकेचे खासगीकरण केले यात ही तथ्य नाही. माझ्या निर्णयाचे आंदोलकांना समाधान झाले नसेल तर त्यांना वरिष्ठांकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.
- निर्मला राशिनकर, मुख्याधिकारी
कोट
खोट्या सह्या करतात
मी सभा घेत नाही म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. ३० मार्चपर्यंत सभा घेतलेल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सभा न घेण्याचे कारण म्हणजे नगरसेवक खोट्या सह्या करीत आहेत. त्यांच्या मीटिंगच्या सह्या खोट्या असतात हे माहीत पडल्याने नंतर सभा घेण्याचे थांबविले. खोट्या सह्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे. त्यांची परवानगी मिळताच नगरपालिकेची सभा घेतली जाणार आहे. आम्ही मनमानी कारभार हा आरोप बिनबुडाचा आहे.
-शीतल कटारिया, नगराध्यक्षा
फोटो : दौंड नगरपरिषदेत राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांच्या मानमानी कारभाराच्या निषेर्धात आंदोलन केले.