जात प्रमाणपत्रासाठी विमुक्तांची भटकंती
By Admin | Updated: May 8, 2014 02:08 IST2014-05-08T02:07:05+5:302014-05-08T02:08:39+5:30
भटक्या समाजातील विद्यार्थ्यांवर जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वंशावळीची नोंदच नसल्याने प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे.

जात प्रमाणपत्रासाठी विमुक्तांची भटकंती
वंशावळीची नोंदच नाही : शिक्षणासाठी केविलवाणी धडपड
तळेगाव(श्यामजीपंत) : / भटक्या समाजातील विद्यार्थ्यांवर जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वंशावळीची नोंदच नसल्याने प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे.
शासनाने भटक्या विमुक्त जमातीचे प्रमाणपत्र देताना ६0 वर्र्षांचा कागदोपत्री पुरावा मागितला आहे. गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही. अशी या समाजाची आजवरची अवस्था आहे. मग कुटुंबाची नोंद कोठे व कशी असणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या समाजातील मुले शिक्षणासाठी पुढे येत आहेत. मात्र त्यासाठी या समाजातील विद्यार्थ्यांना वंशावळीचे पुरावे आणण्याची अट घातली आहे. मागासवर्गीय तसेच भटक्या विमुक्त समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळण्यासाठी या समाजातील व्यक्तींना प्रथम जातीच्या दाखल्याची व जात प्रमाणपत्राच्या अडथळ्याची अट पूर्ण करावी लागत आहे. ही अट पूर्ण करताना केवळ या विद्यार्थ्यांची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची दमछाक होत आहे. जातीचा दाखल व जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केवळ जातीचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने गुणवत्ता असूनही शासकीय नोकरीला मुकण्याची वेळ या समाजातील अनेक विद्यार्थ्र्यांवर आली आहे. पुरावे नसणे किंवा अपुरी कागदपत्रे यामुळे जात पडताळणीची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. सुनावणीच्या वेळी या पुराव्याची दाखल्यासह माहिती द्यावी लागते. अन्यथा या मुलांना आयुष्यभर भटकंती करावी लागत आहे. मागासलेपणाचा कपाळावर शिक्का घेवून आयुष्यभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकत राहिलेला हा समाज आता शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागला हे विशेष.(वार्ताहर)