पुणे: सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याने काळजी घेण्यात येत आहे. राज्यात मे महिन्यात दि. १९ अखेर ६७३ चाचण्यांद्वारे ८७ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले आहे. त्यापैकी ३१ बरे झाले, तर ५६ जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरियंंट सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र योग्य ती काळजी घ्यावी, असे वैद्यक तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाचे सर्व सक्रिय रुग्ण मुंबईतील आहेत. रुग्ण वेगवेगळ्या परिसरातील असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही.
यापूर्वी जानेवारीत २ फेब्रुवारीत १ आणि एप्रिलमध्ये ४ रुग्णांचे निदान झाले होते. मार्चमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मोठ्या लाटेचा धोका नसल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा आहे. कोरोनाचा विषाणू पूर्ण नष्ट झाला नसून, अधूनमधून डोके वर काढत आहे. मात्र सध्याचा व्हेरियंट सौम्य आहे आणि मृत्यूदरही अल्प आहे. त्यामुळे कोरोना नागरिकांनी घाबरून जाऊ नये.