काँग्रेस-राष्ट्रवादीत झाली अर्धमैत्री!
By Admin | Updated: February 3, 2017 04:34 IST2017-02-03T04:34:24+5:302017-02-03T04:34:24+5:30
मोठ्या संख्येने असलेले इच्छुक, कार्यकर्ते यांना झुलवत ठेवत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीसाठी ऐनवेळी आघाडी केली. १६२ जागांपैकी

काँग्रेस-राष्ट्रवादीत झाली अर्धमैत्री!
पुणे : मोठ्या संख्येने असलेले इच्छुक, कार्यकर्ते यांना झुलवत ठेवत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीसाठी ऐनवेळी आघाडी केली. १६२ जागांपैकी १०० जागांवर आघाडी व उर्वरित ६२ जागांवर मैत्रीपूर्ण लढत असा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. उमेदवारांची नावे जाहीर केल्यास नाराज इच्छुक व कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, या भीतीने थेट उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीच एबी फॉर्म देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
गेल्या दोन आठवड्यांच्या चर्चेनंतर आघाडी होणार नाही, असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये आघाडी करण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांची यादी तयार केली होती. नेत्यांच्या आघाडी करायची या निर्णयानंतर त्याचे निरोप रात्रीच देण्यात आले. त्यामुळे गुरुवारी दिवसभर दोन्ही पक्षांचे नेते त्याच तयारीत गुंतले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना मुंबईत बोलावून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण व अन्य काही नेत्यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. उशिरापर्यंत या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. त्यात उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. (प्रतिनिधी)
भाजपाने ५ विद्यमान नगरसेवकांचेच कापले तिकीट
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याच्या भीतीने भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पक्षाच्या
५ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट पक्षाने कापले आहे. -वृत्त/हॅलो
पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडीबाबत चर्चा : महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता. समविचारी पक्षांच्या मताची विभागणी होऊ नये, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. जागा वाटपावरून बुधवारी चर्चा फिस्कटली होती. मात्र, गुरूवारी पुन्हा चर्चा सुरू झाली. दोन्हीही पक्ष याबाबत सकारात्मक असले तरी रात्री उशीरापर्यंत निर्णय झालेला नाही.
स्थानिक नेते तडजोडीस प्रतिकूल असल्याने निर्णय
ज्या प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांना चारही जागा हव्या होत्या, असे एकूण ७ प्रभाग होते. त्यात कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७, लोहियानगर येथील प्रभाग क्रमांक १९, वानवडी येथील प्रभाग क्रमांक २५ तसेच शिवाजीनगर व अन्य काही परिसरातील प्रभागांचा समावेश होता. पक्षाचे अस्तित्व ठेवायचे असल्याने त्यावर तडजोड करण्याची स्थानिक नेत्यांची तयारी नव्हती. ते लक्षात घेऊन या प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, आघाडी असलेल्या १०० जागा व मैत्रीपूर्ण लढत होणाऱ्या ६२ जागा यांचा तपशील दोन्ही पक्षांकडून मिळू शकला नाही. यादी जाहीर न करता पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठीचा एबी फॉर्म थेट उमेदवारी अर्ज दाखल करतानाच द्यायचा, असे ठरवले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अद्याप नेत्यांनी तपशील दिलेला नाही, असेच सांगण्यात येत होते.
मुंबईत झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावरून नेत्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली असल्याची माहिती मिळाली. तुलनेने राष्ट्रवादीची बैठक शांततेत पार पडली.