साखर कामगारांच्या मुलांनाही लागलेत ‘आयटी’चे वेध

By Admin | Updated: February 3, 2017 03:59 IST2017-02-03T03:59:20+5:302017-02-03T03:59:20+5:30

बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आता साखर कारखानदारीचे अर्थकारण बदलताना दिसत आहे. ‘पॅकेज’च्या युगात साखर कामगारांची मुले आता ‘आयटी’ क्षेत्राकडे वळू लागली आहेत.

Children of sugar workers start 'IT' watch | साखर कामगारांच्या मुलांनाही लागलेत ‘आयटी’चे वेध

साखर कामगारांच्या मुलांनाही लागलेत ‘आयटी’चे वेध

- महेश जगताप,  सोमेश्वरनगर
बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आता साखर कारखानदारीचे अर्थकारण बदलताना दिसत आहे. ‘पॅकेज’च्या युगात साखर कामगारांची मुले आता ‘आयटी’ क्षेत्राकडे वळू लागली आहेत. यामुळे भविष्यात साखर कारखानदारीला कुशल कामगारांना मुकावे लागणार असल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे.
साखर कारखानदारीचा कामगार पिढ्यानपिढ्या कमी पगारात भरडून निघाला आहे. सध्या पॅकेजचे युग चालू असतानाही काही साखर कामगार अजूनही महिन्याला सहा ते सात हजारांवर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका करताना दिसत आहे. साखर कारखान्यातील कमी पगारामुळे उत्तम शिक्षण घेतलेली मुले साखर कारखान्यांमधील नोकरी डावलताना दिसत आहेत. लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन तिथे काम करण्यास प्राधान्य देत आहेत. साखर कारखान्यात नोकरीची शाश्वती राहिली नाही, दुष्काळ, उसाची कमतरता, साखरेला भाव नसणे अशी कारणे दाखवून साखर कारखाने कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवतात. अनेक सहकारी साखर कारखाने आता मोडीत निघाले आहेत. दोन-दोन वर्षांचे कामगारांचे पगार थकीत आहेत. परिणामी नोकरी सोडून साखर कामगारांच्या कुटुंबाला शेतात अथवा इतर ठिकाणी मजुरी करून आपल्या कुटुंंबाची उपजीविका चालवावी लागत आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांचा साखर कारखानदारीकडे पाहण्याचा दृष्टिीकोन बदलला आहे. ‘साखर कारखान्यात नोकरी नको रे बाबा’ अशी मानसिकता या तरुण पिढीची झाली आहे. पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी साखर कारखान्यापेक्षा विविध कंपन्यांत चांगले ‘पॅकेज’ तसेच नोकरीची शाश्वती जास्त असते. म्हणूनच आयटीकडे ओढा वाढतो आहे.

नवीन पिढी ग्रामीण भागात काम करण्यास तयार नाही, त्यामुळे ते सुरुवातीला केवळ एक दोन वर्षे कारखान्यात अनुभव घेऊन निघून जातात. साखर कारखानदारीत राजकारणच जास्त चालते. (सहकारी आणि खासगी) प्रामाणिकपणे काम करूनदेखील ना पदोन्नती ना पगारवाढ असे म्हणत नवीन शिकाऊ अभियंते केवळ अनुभव घेऊन निघून जात आहेत. कारखान्यात काम करणारे बहुतेक कर्मचारी हे शेती करता येईल म्हणून जवळच्याच कारखान्यात काम करण्यास प्राधान्य देतात, शेती व पगार या दोन्हीवर घर चालवतात. परंतु शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न व कमी पगार यातून ते प्रगती साधू शकत नाही, म्हणून देखील सध्या नवीन पिढी साखर क्षेत्रात काम करण्यास तयार नाही.

सध्या बरेच सहकारी साखर कारखाने बंद पाडले जात आहेत. खासगी साखर कारखाने कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा देत नाहीत, इतर कंपन्यांप्रमाणे सुरक्षा साधने तसेच जादा वेळ काम (ओव्हरटाईम) केल्याचा जादा मोबदला देत नाहीत. बेरोजगारीची कुऱ्हाड कधीही कोसळेल, या कारणांमुळे साखर क्षेत्रात काम करण्यास उच्चशिक्षित तरुण तयार नाहीत. सध्या साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत, असा निव्वळ देखावा केला जात आहे, असे साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांचे म्हणणे आहे. शासनाने जरी १५ टक्के पगारवाढ करण्याचे ठरवले असले, तरी होणारी पगारवाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. ही पगारवाढ कामगारांच्या कौटुंबिक गरजा भागविणारी नाही.

साखर कारखानदारांनी याचा विचार करावा, अन्यथा भविष्यात साखर कारखान्यांच्या अडचणीत भर पडल्याशिवाय राहणार नाही. या वर्षी उसाच्या कमतरतेमुळे बरेच साखर कारखाने चालू झाले नाहीत त्यामुळे तेथील बरेच अभियंते आणि इतर कामगारांनी वेगळा रस्ता धरला आहे किंवा इतर कारखान्यात काम मिळवले आहे. कारखान्यांनीही वेळीच याकडे लक्ष दिले नाही; तर कारखान्यांना कुशल कामगारांना मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Children of sugar workers start 'IT' watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.