रिक्षा विक्रीत वितरकाकडून फसवणूक
By Admin | Updated: July 2, 2014 01:45 IST2014-07-02T01:45:49+5:302014-07-02T01:45:49+5:30
शहरातील अधिकृत रिक्षा वितरकांकडून रिक्षाच्या मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे

रिक्षा विक्रीत वितरकाकडून फसवणूक
पुणे : शहरातील अधिकृत रिक्षा वितरकांकडून रिक्षाच्या मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. गेल्या ३
वर्षांत शेकडो रिक्षांची विक्री या वितरकाने केली असल्याने रिक्षाचालकांची मोठी फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाले
आहे. संबंधित वितरकास
कारणे दाखवा नोटीस बजावून व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित का करू नये, याची विचारणा आरटीओकडून करण्यात आली आहे.
नाना पेठेतील मनीधारी मोटार्स या वितरकाकडून मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेण्यात येत असल्याची, तसेच रिक्षाबरोबर इलेक्ट्रॉनिक मीटर घेण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार पुणे शहर व जिल्हा
वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे यांनी डिसेंबर २०१३ मध्ये आरटीओकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर
अंकुश शितोळे, प्रदीप टेकाळे
यांच्याही त्यांच्याविरुद्ध तक्रारी
आल्या होत्या. त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे यांनी या तक्रारींची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल आरटीओकडे सादर केला आहे.
रिक्षाच्या एकाच मॉडेलच्या किमतीमध्ये फरक आढळून येतो, राष्ट्रीयीकृत बँक कर्ज योजनेच्या नावाखाली ६ हजार रुपयांची रक्कम जास्त घेतली जात असल्याचे पुरावे तक्रारदाराकडून सादर करण्यात आले होते. चौकशीमध्ये एकाच मॉडेलच्या टॅक्स इनव्हॉईसमध्ये १४८६ रुपयांचा फरक दिसून येतो, तसेच मणिधारी मोटार्स यांच्याकडील इनव्हाईसमध्ये ६ हजारांचा फरक दिसून येतो. १५५० रुपये सर्व्हिस चार्जेस घेतले जातात, असे आढळून आल्याचे नमूद केले आहे.
शोरूमच्या दर्शनी भागामध्ये रिक्षाची मूळ किंमत, व्हॅट व इतर कर, विमा रक्कम, इतर चार्जेस, इलेक्ट्रॉनिक मीटरची किंमत, तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर खरेदी करण्याची सक्ती नसल्याचा फलक लावावा, असा अभिप्राय त्या अहवालामध्ये देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)