चाकणला राष्ट्रीय महामार्गालगतचे कचरा दहन धोकादायक
By Admin | Updated: November 16, 2016 17:32 IST2016-11-16T17:32:06+5:302016-11-16T17:32:06+5:30
येथील सेवा रस्त्याच्या कडेला बिनबोभाट कचरा जाळला जात असल्यामुळे पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या - जाणा-या वाहनांना धोका उद्भवण्याची

चाकणला राष्ट्रीय महामार्गालगतचे कचरा दहन धोकादायक
नगरसेवक राहुल कांडगे यांनी दिला आंदोलनाचा इशारा.
चाकण, दि. १६ : येथील सेवा रस्त्याच्या कडेला बिनबोभाट कचरा जाळला जात असल्यामुळे पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या - जाणा-या वाहनांना धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गा जवळील चाकण - मुटकेवाडी दरम्यानच्या सेवा रस्त्यालगत सातत्याने होत असलेल्या या प्रकाराची तत्काळ दखल घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल कांडगे यांच्यासह येथील वाहनचालक तसेच नागरिकांनी केली आहे.
येथील नगरपरिषद हद्दीतील अनेक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, भाजी विक्रेते ओला सुका कचरा रस्त्याच्या कडेला कशाही पद्दतीने आणून टाकतात. कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी पेटविला जातो. कचरा टाकणारे बरचसे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकच या कच-याला आग लावतात. वा-यामुळे ही आग सर्वत्र पसरून संपूर्ण कचरा जळून जातो. या आगीमुळे धुराचे लोट रस्त्यावर पसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या आगीत प्लास्टिक, काड्या, कागद यांचे प्रमाण जास्त असते. ओल्या सुक्या कचऱ्याने दुर्गंधी सुटते. हवेमुळे ही आग पसरून संपूर्ण कचरा जळला जातो. यातून निघणारे धुराचे लोळ सर्वत्र पसरतात. अशा आगीच्या शेजारून पेट््रोल, डिझेल, रॉकेल, गॅस यांची अतिज्वलनशील वाहने गेल्यास मोठा धोका उद्भवू शकतो. हिवाळ्यातील धुक्याप्रमाणे राज्य मार्गावर पसरणाऱ्या या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय धुराच्या प्रचंड लोटांनी समोरील बाजूने येणारे वाहनही दिसत नसल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून सर्व सामान्य नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेतले जात नसल्याचा आरोप नगरसेवक राहुल कांडगे यांच्यासह या भागातील वाहनचालक व प्रवाशांनी केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
* कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावा, अन्यथा आंदोलन - नगरसेवक राहुल कांडगे
------------------------------------------------------------------------
"चाकण नगर परिषदेच्या हद्दीत वाघेवस्ती, माणिक चौक, भुयारी मार्ग, आंबेठाण रोड, विशाल गार्डन, गावठाण, मुटकेवाडी रस्ता आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असतो. त्यामुळे येथिल परिसराला कचऱ्याची सूज आलेली दिसते. या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक डेंगू, मलेरिया, टायफर, चिकनगुनिया या जीवघेण्या आजारानें फणफणले असून, त्रस्त झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी येथील एका महिलेचा डेंगूने बळी घेतला आहे. कचरा वेळेत उचलला जात नसल्याने नागरिकाना याचा अखंडपणे मनस्ताप सहन करावा लागत आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावा. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येईल, असा इशारा नगरसेवक राहुल कांडगे यांनी दिला आहे."